नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी आडनावावरून केलेल्या वक्तव्यावरून त्यांना मानहानी प्रकरणात दोषी ठरवण्यात आले. त्यानुसार त्यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली.त्यानंतर त्यांना दिल्लीतील त्यांचे सरकारी निवासस्थान सोडण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. यावरून आता राजकीय वर्तुळात एकच गोंधळ निर्माण झाला आहे. त्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी.चिदंबरम यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पी.चिदंबरम यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी सरकारकडून राहुल गांधी यांना टार्गेट करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. तसेच मोदी सरकारकडून एकप्रकारे केंद्रीय तपस यंत्रणांचा वापर करून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे म्हटले.
पुढे बोलताना त्यांनी सुरत सत्र न्यायालयाच्या निर्णयानंतर मोदी सरकारनेच ज्या वेगाने कारवाई केली, तो वेग बघून उसेन बोल्टलाही आर्श्चय वाटेल, असा मार्मिक टोला पी चिंदबरम यांनी लगावला आहे. तसेच राहुल गांधी यांना मिळालेली शिक्षा ही अशा प्रकरणांमध्ये आजपर्यंतची सर्वात कठोर शिक्षा आहे, असेही ते म्हणाले.
दरम्यान, राहुल गांधींवरील कारवाईनंतर काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. यासंदर्भात दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात बैठकही घेण्यात आली होती. याबैठकीला विरोधी पक्षातील नेतेही उपस्थित होते. या कारवाईनंतर विरोधकांनी एकत्र येऊन मोदी सरकारविरोधात लढण्याचे आवाहन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी केले.