नवी दिल्ली : दिल्लीमध्ये गेल्या कित्येक दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. शेतकरी आणि सरकारमध्ये अनेक बैठका झाल्या असून शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम असलेले पाहायला मिळत आहेत. याच दरम्यान आता शेतकरी आंदोलनातील नेते राकेश टिकैत यांनी एक मोठी घोषणा केली. राकेश टिकैत यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. तसेच थेट केंद्र सरकारलाच आव्हान दिले आहे. “देशभरात मार्च काढणार आणि गुजरात केंद्राच्या नियंत्रणातून मुक्त करणार” असे म्हणत राकेश टिकैत यांनी जोरदार निशाणा साधला आहे.
We will march nation-wide, go to Gujarat and set it free. It's controlled by Centre. India is free but people of Gujarat are imprisoned. If they want to join the movement, they are jailed. We are deciding on the date: BKU leader Rakesh Tikait during Mahapanchayat in Bahadurgarh pic.twitter.com/QZkvjDSf5X
— ANI (@ANI) February 12, 2021
मिळालेल्या माहितीनुसार, संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने हरियाणाच्या बहादूरगडमध्ये किसान महापंचायत आयोजित करण्यात आली होती. यात देशभरात मार्च काढण्याची मागणी अनेक शेतकऱ्यांनी केली. गुजरातला मुक्त करू. कारण गुजरात हे केंद्राच्या नियंत्रणाखाली आहे. भारत स्वतंत्र आहे. पण गुजरातमधील जनता ही कैदेत आहे. या आंदोलनात सहभागी होणाऱ्यांना तुरूंगात टाकले जात आहे असा आरोप राकेश टिकैत यांनी केला आहे. तसेच त्यांनी गुजरातमध्ये जाण्याची तारीख अजून निश्चित करण्यात आली नसल्याचे देखील म्हटले आहे. या आंदोलनाचे राजकारण करून नका असेही टिकैत यांनी म्हटले आहे.
शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी किमान आधारभूत किंमत अर्थात MSP बाबत एक मोठं विधान केलं आहे. राकेश टिकैत यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना गव्हाची किंमत थेट सोन्याच्या किमतीशी जोडली आहे. ज्याप्रमाणे सोन्याची किंमत वाढत आहे त्यानुसार गव्हाची किंमत देखील वाढली पाहिजे असं टिकैत यांनी म्हटलं आहे. तसेच 3 क्विंटल (300 किलो) गव्हाची किंमत ही 1 तोळा सोन्याएवढी करायला हवी असेही म्हटले आहे. यासोबतच देशात “टिकैत फॉर्मूला” लागू करा असे सांगितले आहे. 26 जानेवारी रोजी दिल्लीमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर सिंघू बॉर्डरवरील शेतकरी आंदोलनाचे केंद्र आता गाझीपूर बॉर्डर बनले आहे. तेव्हापासून या शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व राकेश टिकैत यांच्याकडे आलं आहे. अशावेळी टिकैत यांनी MSP बाबत केलेल्या विधानाला अधिक महत्व प्राप्त झाले आहे.