पाटण -पाटण तालुक्यात महावितरण कंपनीच्या अनागोंदी कारभाराचा फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसत आहे. तालुक्याच्या ग्रामीण भागात वीज खंडित होण्याचे प्रकार वाढले आहेत. महावितरण कंपनीच्या बेजबाबदार अधिकाऱ्यांमुळे ग्राहकांना मन:स्ताप करावा लागत आहे. वारा आला की वीज गायब हे समिकरणच ग्रामीण भागात निर्माण झाले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक अक्षरशः वैतागून गेले आहेत.
पाटण तालुक्यात गेल्या पाच ते सहा दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पावसाबरोबर सोसाट्याचा वाराही वाहत आहे. मात्र, पावसाबरोबर वाऱ्याची सर्वाधिक ऍलर्जी महावितरण कंपनीला झाली असल्याचे दिसून येत आहे. कारण पाऊस नसला तरी साधा वारा आला तरी महावितरण कंपनीची वीज ग्रामीण भागात गायब होत आहे. महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचा कर्मचाऱ्यांवर अंकुश नसल्याने ही परिस्थिती ओढवल्याचे बोलले जात आहे.
दोन-दोन दिवस वीजपुरवठा खंडित झाला तरी त्याकडे कोणताही कर्मचारी फिरकत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे.
पाटण तालुक्याच्या मोरगिरी, मणदुरे, सडावाघापूर, काठी-आवसरी, मराठवाडी तसेच कोयना विभागात वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले आहेत.
काही गावांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून वीज गायब आहे. याबाबत नागरिकांनी “महावितरण’च्या पाटण कार्यालयाशी संपर्क साधला असता एक तर संपर्क होत नाही. झाला तर समोरचा कर्मचारी उद्धट बोलतो. अधिकाऱ्यांना फोन लावला असता अधिकारी फोन घेत नाहीत. त्यामुळे केवळ पगारासाठी काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी आपण ग्राहकांना सेवा देण्यासाठी बांधिल आहात ही बाब ध्यानात ठेवावी.
शेतकऱ्यांना वीज मीटर बदलण्यासाठी तसेच शेती पंपाला वीज जोडण्यासाठी खराब झालेला विजेचा खांब बदलण्यासाठी ग्राहकांना वेठीस धरतात. पर्यायाने ग्राहकांचा खिसा रिकामा करतात. मात्र पावसाळ्यात ग्राहकांना वीज देणे या महावितरणच्या अधिकाऱ्यांना शक्य होत नाही.
ही बाब गंभीर आहे, अशा महावितरणच्या कारभारामुळेच तालुक्यात नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. यावर संबंधित अधिकाऱ्यांकडून उपाययोजना होताना दिसून येत नाही. पर्यायाने ग्रामीण भागातील जनतेला आजही विजेपासून दूर राहावे लागत आहे. यामुळे विद्यार्थ्यांसह शेतकऱ्यांचे ग्रामीण भागातील छोट्या-मोठ्या व्यावसायिकांचे नुकसान होत आहे.
तालुक्याच्या ग्रामीण भागात पावसाळ्यापूर्वी लाईनची कामे करण्याची गरज असताना ती कामे अधिकाऱ्यांनी केली नसल्याने वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे सध्या पावसाळ्याचे दिवस असून महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तालुक्यातील ग्रामीण भागातील वीज पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी ग्राहकांतून होत आहे.
67 किलोमीटरवर एकच फिडर
पाटण तालुक्यातील मणदुरे विभागात पाटण पासून ढेन, मरड या गावापर्यंत 67 किलोमीटरवर एकच फीडर आहे. मात्र, 67 किलोमीटर पर्यंत कुठेही वीज खंडित झाली असेल तर संपूर्ण फिडर बंद करावा लागतो. त्यामुळे संपूर्ण मणदुरे विभाग अंधारात जातो. त्यामुळे या भागात आणखी एका फिडरची आवश्यकता आहे. मात्र गेल्या चाळीस वर्षात हे काम वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना करता आले नाही हे दुर्दैव आहे.