सॅनिटायझरची मागणी वाढल्याने तुटवडा
खटाव – करोना विषाणूमुळे ग्रामीण भागात लोकांमध्ये भीती निर्माण केली आहे. खटाव परिसरातही लोकही भयभीत झाले आहेत; परंतु ग्रामीण भागातील जनजीवन शेतीवर अवलंबून असल्यामुळे व सध्याचे दिवस सुगीचे दिवस असल्याने लोकांना शेतात जावे लागत आहे. शेतात काम करताना लोक योग्य ती काळजी घेत नसल्याचे दिसून येत आहे.
ग्रामीण भागातही साबण, हॅंडवॉश आणि हॅंड सॉनिटायझरला मोठी मागणी असून या वस्तूंचा तुटवडा जाणवत आहे. महागाई व पुरवठा कमी असल्याने काही लोक मास्कऐवजी तोंडाला बांधण्यासाठी रुमालाचा वापर करत आहेत.
बाजारपेठेवरही मंदीचे सावट आहे. कारणाशिवाय लोक क्वचितच बाहेर पडत आहेत. शेतमालाच्या किमती घसरल्या आहेत. लवकरच दुकाने बंद होतील, अशी भीतीने असल्याने लोक किराणा मालाच्या दुकानांमध्ये गर्दी करत आहेत. सण, उत्सव, आठवडा बाजार, सभा, धार्मिक कार्यक्रमांवरील बंदीचा परिणाम दिसत आहे. बॅंका, पोस्ट, शासकीय कार्यालयांमध्ये कर्मचारी हॅंडवॉश, सॅनिटायझर वापरून काळजी घेत आहेत. मात्र, ग्रामीण भागातील लोकांना याचे फारसे गांभीर्य नसल्याचे जाणवत आहे. त्याला काय होतंय? जे होणार ते चुकतंय का, अशी काहीशी बेफिकिरी दिसत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात करोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांविषयी आणखी जागृती होणे आवश्यक आहे.