उन्हा चांगला जाणार असल्याने शेतकरी सुखावला
केंदूर-यावर्षी सर्वाधिक पर्जन्यमान झाल्यामुळे शिरूर तालुक्यातील ओढे, नाले व तळी अजूनही तुडुंब भरलेली पाहायला मिळत आहेत. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी सुखावला आहे.
शिरूर आणि खेड तालुक्याच्या शेतकऱ्यांना वरदान ठरलेल्या चासकमान धरणातही पुरेसा पाणीसाठा शिल्लक असल्याने या वर्षी शेतकऱ्यांची चिंता दूर झाली आहे. करंदी, केंदूर, पिंपळे जगताप, वाजेवाडी, जातेगाव या भागातील छोटे मोठे तलाव, ओढे नाले यावर्षी 100 टक्के भरल्याने भूजल पातळीमध्ये चांगलीच वाढ झाल्याने परिसरातील विहिरी अजूनही तुडुंब भरलेल्या पाहायला मिळत आहेत. या पाणीसाठ्यामुळे किमान दीड महिना तरी पाण्याची कमतरता जाणवणार नाही. गेल्यावर्षी शेतकऱ्यांना भीषण दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागल्या होत्या. त्यामुळे पाण्याबाबत तालुक्यातील शेतकरी चांगलेच जागृत झाले आहेत. त्यामुळे परिसरात पाणीसाठा मुबलक असल्यामुळे सध्यातरी शेतकरी चासकमानच्या आवर्तनाची मागणी करणार नाहीत.
चासकमान धरणात जरी भरपूर पाणीसाठा उपलब्ध असला तरी भविष्याची अडचण ओळखून शेतकरी सावध पवित्रा घेतील; मात्र लोकप्रतिनिधींनी देखील चासकमानच्या आवर्तनाचे योग्य नियोजन करण्याची गरज आहे. याआधी नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यातच रब्बी हंगामातील पहिले आवर्तन सोडण्याची मागणी होत होती; मात्र यावेळी अजून एक ते दीड महिना पाणीसाठा पुरणार त्यामुळे आत्ता तरी पाण्याची मागणी होणार नाही. त्यामुळे भविष्यात किमान यावर्षी तरी पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार नसल्यामुळे शेतकरी आनंद व्यक्त करत आहेत.