मुंबई – ठाकरेबंधूंनी एकमेकांना राजकीय टाळी दिल्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखालील ठाकरेसेना आणि मनसे या पक्षांना शिंदेसेनेने डिवचले. शुन्याशी शून्य जोडला तरी शुन्यच राहतो, अशी प्रतिक्रिया शिंदेसेनेच्या गोटातून देण्यात आली.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाकरेसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी जुळवून घेण्यास तयार असल्याचे सूचित केले. राज यांनी घातलेल्या त्या सादेला उद्धव यांनी सशर्त; पण सकारात्मकतेकडे झुकणारा प्रतिसाद दिला.
त्यामुळे ठाकरेबंधूंमध्ये मनोमिलन होण्याची शक्यता वर्तवणाऱ्या चर्चा रंगल्या आहेत. त्यावर शिंदेसेनेचे नेते संजय निरूपम यांनी ठाकरेबंधू आणि त्यांच्या पक्षांना डिवचणारी प्रतिक्रिया दिली.
महाराष्ट्र हिताच्या नावाखाली ठाकरेसेना आणि मनसे स्वहिताचा अजेंडा राबवतात. ती बाब ध्यानात आल्याने जनतेने दोन्ही पक्षांना नाकारले. त्या पक्षांचा राजकीय प्रभाव ओसरला आहे. राजकीय अस्तित्वासाठी ते एकमेकांचा आधार घेऊ पाहत आहेत.
विधानसभा निवडणुकीत मनसे एकही जागा जिंकू शकली नाही. उद्धव यांनी व्यक्तिगत आकांक्षेसाठी कॉंग्रेसशी हातमिळवणी करून हिंदुत्वाचा त्याग केला. ठाकरेसेना आणि मनसे हे दोन्ही पक्ष राजकीयदृष्ट्या दिवाळखोर बनले आहेत, असे टीकास्त्र त्यांनी पत्रकारांशी बोलताना सोडले.