आकाश दडस
जयकुमारांविरोधात तोच तो फॉर्म्युला
या मतदारसंघात मराठा, माळी, धनगर या समाजाची लोकसंख्या जास्त आहे. कोपरा बैठकांमध्ये प्रचार करताना या समाजातील अनेक नेतेमंडळी पाहायला मिळाली. जयकुमार यांना पाडण्यासाठी दोन्ही निवडणुकांमध्ये हा फॉर्म्युला वापरला गेला होता. यंदाही त्याचा वापर होईल. त्यात धनगर समाजाचे नेतृत्व करणाऱ्या पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांचाही प्रभाव जास्त दिसेल, अशी चर्चा आहे.
बिदाल – विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला तरी माण-खटाव विधानसभा मतदारसंघातील चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. कॉंग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली असली तरी जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. दुसरीकडे युतीचे घोडेही जागावाटपावरूनच अडले आहे. त्यामुळे निवडणुकीत उमेदवार कोण, हे स्पष्ट झालेले नाही. भाजप-शिवसेनेतील इनकमिंगमुळे नेत्यांनी झेंडे बदलले असले तरी चेहरे तेच आहेत. परिणामी गेल्या काही निवडणुकांमधील नेतेच या निवडणुकीतही एकमेकांच्या विरोधात उभे ठाकणार आहेत.
माण आणि खटाव या दोन्ही तालुक्यांचे राजकारण वर्षानुवर्षे दुष्काळाभोवतीच फिरत राहिले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हाच मुद्दा नेत्यांनी त्यांच्या राजकीय पोळ्या भाजून घेण्यासाठी वापरला. शरद पवार हे माढा लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते. या लोकसभा मतदारसंघात माण-खटाव विधानसभा मतदारसंघाचाही समावेश आहे. मात्र, शरद पवारांसारख्या राष्ट्रीय नेत्याला येथील जनतेने भरघोस मतदान करूनही येथील जलसंधारणाची कामे होऊ शकली नाहीत.
आजूबाजूच्या तालुक्यांमध्ये पाण्याचे कालवे झाले तरी माण तालुका आजही तहानलेला आहे. माण-खटाव विधानसभा मतदारसंघातून 2009 आणि 2014 च्या निवडणुकांमध्ये कॉंग्रेसचे जयकुमार गोरे आमदार झाले. 2014 च्या निवडणुकीत आ. जयकुमार गोरे यांना त्यांचे बंधू शेखर गोरे यांनी रासपमधून चांगली लढत दिली होती. त्यातही जयकुमार गोरेंनी बाजी मारली होती. त्या निवडणुकीत गोरे बंधूंबरोबर राष्ट्रवादीकडून माजी आमदार सदाशिवराव पोळ, शिवसेनेकडून रणजित देशमुख, अपक्ष उमेदवार अनिल देसाई हेदेखील रिंगणात होते. त्यांच्यापैकी कोणीच जयकुमार गोरेंना टक्कर देऊ शकले नव्हते.
यंदा मात्र आ. जयकुमार गोरे यांना निवडणूक कठीण जाणार असल्याचे चित्र आहे. लोकसभा निवडणुकीत जयकुमार यांनी भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पाठिंबा दिला होता. कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार संजय शिंदे यांच्या विरोधात त्यांनी काम केले. रणजितसिंह खासदार झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जयकुमार यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला; पण भाजपचे स्थानिक व निष्ठावंत नेते आणि कार्यकर्त्यांनी जयकुमार यांना उमेदवारी देण्यास कडाडून विरोध केला आहे.
“आमचं ठरलंय’ हा कोल्हापूर पॅटर्न माण-खटाव मतदारसंघातही सुरू झाला आहे. भाजप नेते व माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई, राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रभाकर घार्गे, शिवसेनेचे रणजितसिंह देशमुख, राष्ट्रवादीचे नेते व माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, रासप व इतर मित्रपक्षांचे नेते जयकुमार यांच्याविरोधात एकत्र आले आहेत. जयकुमार यांच्याविरोधात सर्वपक्षीय नेते एकवटले असले तरी शेखर गोरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. ते “आमचं ठरलंय’ टीममधील नेत्यांसोबत नाहीत. त्यामुळे या मतदारसंघातील राजकीय समीकरणे आता पुन्हा बदलण्याची शक्यता असून येथील लढत लक्षवेधी ठरेल, यात शंका नाही.