रेडा (प्रतिनिधी) – इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना उजनी धरणातून जे सांडपाणी पाच टीएमसी मिळणार होते. यासंदर्भात शासनाने काढलेला आदेश जलसंपदा विभागाचे उपसचिव यांनी जरी रद्द केला असला तरीदेखील,इंदापूर तालुका पाणी संघर्ष कृती समिती व तमाम शेतकरी न्यायालयीन लढा जिंकतील व तालुक्यातील साठ गावांना पाच टीएमसी पाणी नक्की मिळेल.असा विश्वास शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष श्रीमंत ढोले यांनी व्यक्त केला आहे.
उजनी धरणातून इंदापूर तालुक्याला पाणी मिळण्याचा आदेश अखेर रद्द केल्याचा आदेश जलसंपदा विभागाचे उपसचिव वैजनाथ चिल्ले यांनी(ता.27 मे रोजी) काढला आहे.त्यामुळे इंदापूर तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे यासंदर्भात कृती समितीचे अध्यक्ष श्रीमंत ढोले पत्रकारांशी बोलत होते.
पुढे बोलताना ढोले म्हणाले की,शासनाच्या सर्व निकषानुसार पुण्यातून येणारे पाच टीएमसी उजनी धरणातील सांडपाणी इंदापूर तालुक्याला देण्याचा निर्णय झालेला होता.कित्येक वर्षापासून तालुक्यातील शेतकरी आपल्या हक्काच्या पाण्यासाठी झगडत आहेत.
मात्र सोलापूर जिल्ह्यातील काही बोटावर मोजण्याइतक्या लोकांनी विरोध दर्शवून इंदापूर तालुक्याचे हक्काच्या पाण्यावर गदा आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. असे असले तरीदेखील तालुक्यातील शेतकऱ्यांचे व कृती समितीची मागणी अत्यंत नियमानुसार असल्यामुळे न्याय देवता चांगला निर्णय देईल.न्याय देवतेवर प्रचंड विश्वास असल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे हक्काचे पाच टीएमसी पाणी मिळणार यामध्ये तिळमात्र शंका नाही. अशीही माहिती कृती समितीचे अध्यक्ष श्रीमंत ढोले यांनी दिली.
कृती समितीच्या माध्यमातून न्यायालयीन लढा सनदशीर मार्गाने लढला जाईल.त्यामुळे कोणतेही शेतकऱ्याने घाबरण्याचे कारण नाही.सरकार देखील शेतीच्या पाण्याचा महत्त्वाचा विषय असल्यामुळे इंदापूर तालुक्याला पाणी देण्यासाठी सकारात्मक विचार पुन्हा करेल.
यासाठी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून लढत आहेत याचा सर्व शेतकऱ्यांना सार्थ अभिमान आहे.मात्र सोलापूर जिल्ह्याला बेकायदेशीर उजनी धरणातील एक थेंब देखील पाणी शेतकरी कृती समिती कदापि जाऊ देणार नाही.असा इशारा श्रीमंत ढोले यांनी दिला आहे.