पाटणा – कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीयमंत्री तारिक अन्वर यांनी म्हटले, बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भलेही नितीशकुमार पुन्हा मुख्यमंत्री होणार असले तरी या वेळेस सत्तेचा लगाम दुसऱ्या कुणाच्या तरी हाती असेल, आणि नितीशकुमार रिमोट कंट्रोलच्या इशाऱ्याने काम करतील.
भाजपाने जाणूनबुजून आणि वेगळ्या रणनीतीने नितीशकुमार यांना हतबल केले असल्याचेही अन्वर यांनी म्हटले. पुढे ते असेही म्हणाले की, याअगोदर नितीशकुमार एनडीएचे एक प्रभावशाली नेता आणि मुख्यमंत्री राहिले आहेत.
दरम्यान, एनडीएने पुन्हा नितीशकुमार यांना सभागृह नेता म्हणून निवड केली आहे. एनडीएचा नेता बनल्यानंतर आमदारांसह राज्यपालांच्या भेटीसाठी ते गेले आहेत. नितीशकुमार सातव्यांदा राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.
बिहार विधानसभेतील 243 जागांपैकी 75 जागा तेजस्वी यादव यांनी जिंकल्या असल्याने प्रबळ विरोधी पक्ष म्हणून कार्य करणार आहे. त्यानंतर 74 जागा भाजपाने जिंकल्याने राज्यातील दुसरा मोठा पक्ष बनला आहे. नितीशकुमार यांच्या जेडीयू पक्षाला 43 जागांवर समाधान मानावे लागले आहे.
याचाच अर्थ, भाजपाच्या जागा नितीशकुमार यांच्या पक्षापेक्षा अधिक असल्याने भाजपाचा त्यांच्यावर वचक राहणार आहे. यामुळे रिमोट कंट्रालचे काम भाजप करणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही.