मुंबई : राज्यात मागील दोन वर्षात वादळ, अतिवृष्टी, महापूर या सगळ्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याचा फटका शेतकऱ्यांना जास्त बसला. मात्र सरकारकडून शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला देण्यात न आल्याने विरोधी पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये पीकविमा आणि नुकसान भरपाईचा मुद्दा हा भाजपाच्या प्रचारातल्या मुद्द्यापैकी एक महत्त्वाचा मुद्दा ठरणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. याच मुद्द्यावरुन भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज ठाकरे सरकारला सणसणीत टोला लगावला आहे.
नांदेड जिल्ह्यातल्या कुंडलवाडी इथे देगलूर पोटनिवडणुकीसाठी झालेल्या प्रचार सभेत फडणवीस बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. अद्याप शेतकऱ्यांना पीकविम्याची पुरेशी रक्कम मिळालेली नाही.
आपल्या सरकारच्या काळात आपण किती रक्कम प्रत्येक जिल्ह्याला दिलेली होती, हे मुद्दे त्यांनी या भाषणात अधोरेखित केले. राज्य सरकार स्वतः भ्रष्टाचार करत आहे आणि मदत द्यायची वेळ आली की केंद्राकडे बोट दाखवत आहे, अशा आशयाची टीका करत त्यांनी ठाकरे सरकारला जबरदस्त टोला लगावला आहे.
यावेळी बोलताना ते म्हणाले, “हे सरकार इतकं लबाड आहे की काहीही झालं तरी ते केंद्र सरकारकडे बोट दाखवतात. मला तर असं वाटतंय की यांच्या बायकोने मारलं तरी सांगतील की केंद्र सरकारचा हात आहे, असे लबाड लोक इथं आहेत”.