विधासभेचं विशेष अधिवेशन आज असल्यामुळे सर्व आमदार विधानभवनात दाखल झाले. यावेळी कडेकोट बंदोबस्त पाहायला मिळाला. विशेष म्हणजे बंडखोर शिंदे गटदेखील विधानभवनात दाखल झाल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अतिरिक्त सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले होते त्यामुळे शिवसेनेचे माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी कसाबवेळीही आम्ही मुंबईत इतका बंदोबस्त पाहिला नसल्याचे वक्तव्य केले.
विधानभवनात दाखल होताच आदित्य ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आजच्या अधिवेशनासाठी शिवसेनेचाच व्हीप अधिकृत असल्याचे आदित्य यांनी यावेळी सांगितले. एवढी सुरक्षा नेमकी कशासाठी आमदारांना कोण पळवून नेणार आहे का ? विधानभवनात राज्यातील इतका बंदोबस्त असताना बाकी सुरक्षा कशाला असे सवाल देखील यावेळी आदित्य ठाकरेंनी उपस्थित केले.
सुनील प्रभूंनी काढलेला व्हीप सर्व आमदारांना पाळावा लागणार तसेच बसमधून ज्यांना आणलं त्यांच्याबद्दल वाईट वाटतंय असंही स्पष्ट मत आदित्य यांनी यावेळी मांडलं. तसेच आरे कार शेडबाबत बोलताना आमचा राग मुंबईवर काढू नका एकदा तरी मुंबईचा विचार करा असे आवाहन यावेळी त्यांनी सरकारमधील भाजपला केलं.
शिवसेना की शिंदेसेना
महाराष्ट्र विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. यादरम्यान आधी विधानसभा अध्यक्षांची निवड होईल, त्यानंतर एकनाथ शिंदे सरकारला बहुमत चाचणी द्यावी लागणार आहे. हे अधिवेशन चांगलेच गदारोळाचे होण्याची शक्यता आहे. यादरम्यान पहिल्यांदाच ‘शिवसेना विरुद्ध शिवसेना’ असा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे.