मुंबई – चालू आठवडयात शेअर बाजारात फक्त चार दिवसच सुरु राहिला. या एकूण चार दिवसांमध्ये सोमवारी बाजारात घसरण राहिली होती. तर मंगळवारच्या सत्रात मात्र तेजीचा माहोल होता. त्यानंतर बुधवारी पुन्हा घसरण नोंदवत बाजार बंद झाला. गुरुवारी मात्र रामनवमी असल्याने देशातील शेअर बाजार बंद होते. त्यानंतर नेहमीप्रमाणे शुक्रवारी आठवडयातील शेवटच्या दिवशी बाजार 358 अंकाच्या तेजीसोबत सुरु झाला आणि त्याच्या 1 मिनिटानंतर बाजाराने घसरण सुरु केली.
आशियाई विकास बॅंकेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशाचा आर्थिक विकास दराचे अनुमान घटवले असून ते 4 टक्क्यांवर राहणार असल्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे भारतासोबत जगाची वाटचाल मंदीच्या दिशेने होत असल्याचे विविध अहवालातून सांगण्यात येत आहे.
करोनाचा वाढता प्रसार आणि त्यामुळे जगासोबत देशातील उद्योगधंदे बंद झाले आहेत. यामुळे गुंतवणूकदार मोठया काळजीत आहेत. त्यामध्ये सध्या बॅंकिंगचे व्यवहार सुरु आहेत. परंतु त्याच्यावरही मोठा दबाव असल्याचे दिसून येत आहे. मागील काही दिवसांमध्ये बॅंकिंगचेच समभाग सर्वाधिक घसरत आहेत.
शुक्रवारी बीएसई सेन्सेक्स 674 अंकानी घसरुन निर्देशांक 27,590.95 वर बंद झाला दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 170 अंकांनी घसरुन निर्देशांकात 8083.80 इतकी घसरण नोंदवण्यात आली आहे. दिवसभरात ऍक्सिस बॅंकेचे समभाग सर्वाधिक 9 टक्क्मयांनी घसरलेत तर इंडसइंड बॅंक, आयसीआयसीआय बॅंक, टायटन, स्टेट बॅंक, मारुती सुझुकी, एचडीएफसी आणि एशियन पेन्ट्स यांचे समभाग नुकसानीत राहिले आहेत. दुसरीकडे सन फार्मा, आयटीसी, ओएनजीसी, महिंद्रा ऍण्ड महिंद्रा आण टेक महिंद्रा यांचे समभाग तेजीत राहिलेत.
करोनाच्या जागतिक महामारीने संपूर्ण विश्वाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. यामुळे आर्थिक क्षेत्रात अश्चितता निर्माण झाली आहे. याचा फटका अमेरिकेसह आशियामधील शेअर बाजारांना बसला आहे.