लॉकडाऊनमुळे दुरुस्ती रखडली : धरणातून गळती रोखण्याचे मोठे आव्हान
वडगाव मावळ, दि. 31 (प्रतिनिधी) -श्रीक्षेत्र आळंदी, देहूसह 30 गावांची तहान भागविणारे नाणे मावळातील वडिवळे धरणात अवघा 20 टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. वडिवळे धरणातून 2015 पासून गळती सुरू झाली असून, हे गळतीचे काम अपूर्ण आहे. भविष्यात पाणीटंचाई अथवा दुर्घटना घडल्यास पाटबंधारे विभाग जबाबदार असल्याने या धरणाच्या गळतीचे काम तातडीने व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे.
सह्याद्रीच्या डोंगर रांगातील नाणे मावळातील कुंडलिका नदीवर सव्वा टीएमसी पाणीसाठा असलेल्या वडिवळे धरणाचे खासदार शरद पवार यांचा हस्ते 22 ऑक्टोबर 1978 साली भूमिपूजन झाले. त्यानंतर 1989 मध्ये धरणात पाणीसाठा करण्यात आला. या धरणातील पाणी इंद्रायणी नदीपात्रातून मरकळ “एमआयडीसी’पर्यंत पोहचविले जाते. या धरणाच्या पाण्यामुळे परिसरातील हजारो हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आहे. या धरणाच्या गळतीला सन 2015 पासून सुरुवात झाली. त्यात पाटबंधारे विभागाकडून तात्पुरती डागडुजी करण्यात आली. आतापर्यंत धरणाच्या गळतीची पूर्णपणे दुरुस्ती करण्यात आली नाही. ही गळती कायम असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
वडिवळे धरणाच्या गळतीच्या दुरुस्तीचे काम कोल्हापूर येथील श्रीनिवास कन्स्ट्रक्शनला 6 कोटी रुपयांच्या दिले असून, त्यांच्या कामाचा कालावधी दोन वर्षांचा आहे. वडिवळे धरणाच्या गळतीच्या कामाची सुरुवात मार्च 2020 च्या दुसऱ्या आठवड्यात करण्यात आली. पण लॉकडाऊन सुरू झाल्याने काम अपूर्णच राहिले आहे. या कामासाठी वडिवळे पाटबंधारे विभागाकडून धरणातील पाणीसाठा कमी केला. पण या धरणाच्या गळतीचे काम अपूर्ण असून, सद्यस्थिती 20 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.
मावळ तालुक्यात अद्यापही समाधानकारक पाऊस पडला नाही. भविष्यात पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण होऊ नये. धरणात 100 टक्के पाणीसाठा झाल्यावर गळतीने भविष्यात अपघात झाला, तर इंद्रायणी नदीपात्रालगतच्या गावांना धोका निर्माण होईल. पाटबंधारे विभागाने धरणाच्या गळतीच्या दुरुस्तीबाबत सतर्कता दाखविणे आवश्यक आहे. त्यातच गेल्या अनेक वर्षांपासून डाव्या कालव्याचा प्रश्न अपूर्ण असल्याने परिसरातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
धरणाच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे वाढली असून, त्यांच्यावर त्वरित कारवाई करावी. भविष्यातील पिण्याच्या पाण्याचा तसेच शेतीच्या पाण्याचा विचार करता, वडिवळे धरणाच्या गळतीच्या दुरुस्तीचे काम त्वरित करावे. कामात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आमदार सुनील शेळके यांनी केली.
गळतीच्या कामाला “ब्रेक’
कार्यकारी अभियंता राजेंद्र धोपडकर म्हणाले की, वडिवळे धरणाच्या गळतीच्या दुरुस्तीच्या कामाचा ठेका श्रीनिवास कन्स्ट्रक्शनला दिला आहे. त्यांना गुणवत्तापूर्ण काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर 22 मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाल्याने कामगार गावी गेले. वारंवार लॉकडाऊन वाढल्याने काम करता आले नाही. पण यावर्षी 100 टक्के धरण भरणार आहे. डिसेंबरपर्यंत पाणीसाठा कमी करून गळतीच्या दुरुस्तीने काम पूर्ण करणार आहे. धरण परिसरातील अतिक्रमणे काढण्याच्या सूचना संबधित वडिवळे पाटबंधारे शाखा अभियंता मनोहर खाडे यांना देण्यात आल्या आहेत.
पाटबंधारे विभागाने वडिवळे धरणाच्या गळतीच्या दुरुस्तीच्या कामाला प्रथम प्राधान्य देणे आवश्यक आहे. मावळ तालुक्यात आतापर्यंत समाधानकारक पाऊस झाला नाही. भविष्यात पाणी टंचाई व दुर्घटना झाल्यास पाटबंधारे विभाग जबाबदार राहिल. ठेकेदाराकडून काम अपूर्ण असलेल्या कामाच्या ठिकाणी त्वरित दुरुस्ती करावी.
– सुनील शेळके, आमदार
वडिवळे धरणाला 2015 पासून गळती सुरू असून, तात्पुरती डागडुजी केली. मात्र पाटबंधारे विभागाने धरणाच्या गळतीच्या दुरुस्तीच्या कामाकडे दुर्लक्ष झाल्याने अपूर्ण राहिले. भविष्यात धरण फुटून दुर्घटना झाली अथवा पाणी टंचाई झाली, तर पूर्णपणे पाटबंधारे विभाग जबाबदार राहील. पाटबंधारे विभागाने वेळीच सावध होऊन त्वरित दुरुस्तीचे काम पूर्ण
करून घ्यावे.
– रमेश भूरूक, सामाजिक कार्यकर्ते.