पुणे – मृत करोनाबाधितांचे मेल्यानंतरही हाल होत असून, शववाहिनी नाही, अंत्यसंस्कारासाठी तासन्तास वाट पाहणे असे प्रकार घडत आहेत. अशीच स्थिती दफनभूमीतही असून, त्याचा नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
करोनाबाधित मृतांची संख्या वाढत आहे. रोज किमान 50 बाधितांचा मृत्यू होत आहे. जानेवारी 2021 नंतर ही संख्या कमी झाली होती; परंतु मार्चनंतर बाधितांच्या संख्येबरोबर मृतांची संख्याही वाढली. असे असताना त्यांच्या अंत्यसंस्काराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
महापालिकेने गेल्यावर्षी येरवडा आणि कैलास स्मशानभूमी या दोनच ठिकाणी करोना बाधितांच्या अंत्यसंस्काराची सोय केली होती. बाधित मृतांची संख्या वाढल्यानंतर आणि या दोन स्मशानभूमीवरील ताण वाढल्यावर अन्य स्मशानभूमींमधील एक विद्युतदाहिनी करोनाबाधितांच्या अंत्यसंस्कारासाठी देण्यात आली.
त्यामुळे वैकुंठ वगळता सर्वच स्मशानभूमींमध्ये बाधितांवर अंत्यसंस्कार केले जात होते. मात्र डिसेंबरनंतर बाधित मृतांची संख्या कमी झाल्यावर पुन्हा दोन ठिकाणीच ही सोय ठेवली. पुन्हा अन्य स्मशानभूमीत ही सोय कार्यान्वित करावी लागणार आहे.
याशिवाय, दफनभूमीचीही हीच समस्या आहे. याठिकणीही वेटिंगवर मृतदेह ठेवले आहेत. त्यामुळे येथेही अंत्यसंस्काराला वेळ लागत असल्याने शववाहिन्या येथेही अडकून पडतात आणि मृतदेह रुग्णालयातच वेटिंगवर ठेवावे लागत आहेत.
रोज सुमारे 135 मृतदेह अंत्यसंस्कारासाठी येतात. सगळे करोनाबाधित आहेत, अशी नोंद होते. एकट्या ससूनमधूनच सुमारे 30 ते 35 मृतदेह अंत्यसंस्कारासाठी येतात. करोना मृतांची संख्या रोजची एवढी नाही, तरी कोविडच्या डायरीत त्याची नोंद होत आहे. त्याची माहिती सध्या घेत आहे. याशिवाय, आता शववाहिकांसाठी स्पेशल ऍप तयार करण्यात येणार आहे. “ओला’, “उबेर’सारखी याची सिस्टिम असणार आहे. या ऍपवरून ही शववाहिका मागवता येणार आहे. यामुळे त्याचे रेकॉर्ड ठेवणे आणि ते ट्रॅक करणे सोपे जाणार आहे.
– श्रीनिवास कंदूल, विद्युत विभाग प्रमुख, पुणे महापालिका