काम पूर्ण होईपर्यंत टोल वसुली स्थगित करा; सजग नागरी मंचाची नितीन गडकरींकडे धाव
पुणे – देहूरोड येथून सुरू झालेल्या पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरण तसेच उड्डाणपुलाचे काम दि. 31 मार्च 2013 रोजी पूर्ण होणे अपेक्षित होते. पण, आता आठ वर्षे झाली तरी हे काम पूर्ण झालेले नाही. यामुळे मागील काही वर्षांत अनेक अपघात झाले. यामध्ये शेकडो जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. यावर आता रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत टोल वसुली पूर्णपणे स्थगित करण्याची मागणी पुढे आली आहे. यासाठी थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे धाव घेण्यात आली आहे.
पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्ग हा चार पदरी होता. त्याच्या सहा पदरीकरणाचे काम दि. 1 ऑक्टोबर 2010 रोजी सुरू करण्यात आले. मूळ कंत्राटाप्रमाणे हे काम दि. 31 मार्च 2013 पर्यंत पूर्ण अपेक्षित होते. मात्र, याचे काम अद्यापही सुरूच आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या कामाला सातत्याने मुदतवाढ देण्याशिवाय काहीही केलेले नाही.
या अपूर्ण कामामुळे मागील 11 वर्षांत या रस्त्यावर शेकडो अपघात झाले, निष्पाप नागरिकांचा बळी गेला. वाहतूक कोंडीमुळे हजारो कोटी रुपयांचे इंधन वाया गेले आणि लक्षावधी नागरिकांचे कामाचे तास वाया गेले. मात्र, याची खंत अथवा खेद महामार्ग प्राधिकरणाला तसेच कंत्राटदाराला नसल्याचे या पत्रात नमूद केले आहे. याविषयी माहिती देताना विवेक वेलणकर यांनी सांगितले की, “दरवर्षी महामार्ग प्राधिकरण कंत्राटदाराला टोलचे दर मात्र वाढवून देत आहे.
प्राधिकरणाकडून आजवर या कंत्राटदाराला अनेक नोटीस दिल्या आहेत. मात्र, पुढे काहीच कारवाई होत नाही. त्यामुळे या रस्त्यावर अनेक कामे प्रलंबित आहेत. सेवा रस्ता अनेक ठिकाणी अस्तित्वातच नाही आणि जिथे आहे तिथे त्याची अवस्था अनेक ठिकाणी दयनीय आहे. तसेच अनेक ठिकाणी खड्डे आहेत.’
पुणे-सातारा रस्त्याचे काम पूर्ण न करणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. तसेच अपूर्ण कामाचा त्रास सहन करणाऱ्या वाहनचालकांना दिलासा म्हणून गुरुवारपासून (दि.1) काम पूर्ण होईपर्यंत टोल वसुली स्थगित करावी.
– विवेक वेलणकर, सजग नागरिक मंच