पुणे -शहरातील प्रमुख सार्वजनिक वाहतूक असणाऱ्या पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) सेवेचे आर्थिक चाक अधिकच रुतत असल्याचे चित्र आहे. मागील 14 वर्षांमध्ये खर्च आणि उत्पन्नाची सांगड न जुळल्याने पीएमपी तोट्यात सुरू आहे. दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा आर्थिक तोटा होत असून, ही काही “शे’ कोटींच्या घरात आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरासह आसपासच्या भागांत पीएमपीकडून सेवा देण्यात येते. सध्या पीएमपीच्या ताफ्यात सुमारे दोन हजारांच्या घरात बसेस आहेत. प्रवासी उत्पन्नांसह विविध मिळकती, डेपोंचा विकास, जाहिराती आदी माध्यमातून पीएमपीला उत्पन्न मिळते. मात्र, असे असूनही पीएमपीची धाव मात्र तोट्यात सुरू आहे. ही रक्कम थोडीथोडकी नसून, तब्बल शंभर ते दोनशे कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.
स्थापनेपासून म्हणजे 2007 पासून पीएमपीची प्रवासी सेवा एकदाही फायद्यात धावली नाही. त्याउलट दरवर्षी तुटीचा हा आकडा वाढतच आहे. दरवर्षी महापालिकेकडून पीएमपीला संचलन तूट देण्यात येते. यामध्ये 60 टक्के पुणे मनपा आणि 40 टक्के पिंपरी-चिंचवड पालिकेकडून तूट देण्यात येते. मागील वर्षी करोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवासी सेवा स्थगित केली होती. त्यामुळे मागील वर्षी सुमारे 315 कोटी रुपयांचा तोटा झाला होता.