टी-20 क्रिकेटने जागतिक क्रिकेटचे आयामच बदलून टाकले. हेच चित्र यंदाच्या आयपीएल स्पर्धेतही दिसत आहे. एकेकाळी एकदिवसीय सामन्यात संपूर्ण 50 षटकांत 180 ते 220 धावा झाल्या तर विजयाची शक्यता नव्हे तर खात्रीही असे. आता टी-20 क्रिकेटमध्ये तब्बल 200 धावांही अपुऱ्या वाटू लागल्या आहेत. म्हणजेच जी धावसंख्या वन्स इन अ ब्लु मुन मानली जात होती ती द्विशतकी धावसंख्या टी-20 क्रिकेटमध्ये विनोद बनली आहे.
रॉयल चॅलेंजर बेंगळुरूने द्विशतकी धावा उभारूनही लखनौ सुपर जायंट्सने त्याला चांगला पाठलाग केला. काही धावा कमी पडल्याने त्यांना पराभवाचा सामना करावा लागला असला तरीही ही धावसख्याही अपुरी होती हेच दिसून आले. कॉपीबुक क्रिकेट किंवा तंत्रशुद्ध फलंदाजी काळाच्या पडद्याआड केली व आततायी फटकेबाजी करणाऱ्यांना सुगीचे दिवस आले.
उप्परकट, हेलिकॉप्टर शॉट, लॉफ्टेड शॉट, रिव्हर्स हीट किंवा स्वीच हिट असे फटके उदयाला आले. खरे तर या फटक्यांना तंत्रशुद्ध क्रिकेटच्या परिभाषेत चुकलेले फटके मानले जात होते. मात्र, आता हे फटके मारून वादळी फलंदाजी करत असलेल्या फलंदाजांना कोटीच्या कोटी रुपयांचे करार मिळतात व तेच दीग्गज खेळाडू (निदान टी-20 क्रिकेटमध्ये) मानले जातात.
20 षटकांच्या सामन्यांत 200 धावा म्हणजे सरासरी प्रत्येक षटकामागे 10 धावांची गती. टी-20 हे फलंदाजांचे नंदनवन असते तर गोलंदाजांसाठी नामुष्कीचे कारण. आपल्या लहानपणापासून बाळगलेल्या देशाकडून खेळण्याच्या स्वप्नांचा चुराडा याची देही याची डोळा पाहण्याचे दुर्भाग्य गोलंदाजांसमोर येते. एखाद्या गोलंदाजाने टी-20 क्रिकेटमध्ये चार षटकांत 35 धावा दिल्या तरीही तो अचूक गोलंदाज मानला जातो.
तसाही क्रिकेटचा खेळ फलंदाजांचाच मानला जातो. उद्या जसप्रीत बुमराह कसी गोलंदाजी करतो हे पाहण्यासाठी हजारो प्रेक्षक मैदानावर येणार नाहीत पण कोहली, रोहित किंवा अन्य कोणी आक्रमक फलंदाज फलंदाजी करतोय म्हटल्यावर मैदाने ओसंडून वाहू लागतील. असो, तर येणाऱ्या काळात द्विशतकी धावाही कमी पडू लागतील आणि मग संघाच्या धावसंख्येचे त्रिशतकही धावफलकावर झळकलेले दिसेल.