मंचर/पारगाव शिंगवे – केंद्र सरकारने पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण करण्यास परवानगी दिल्याने इथेनॉल निर्मितीत वाढ होऊन साखरेचे उत्पादन कमी झाल्यास आंतरराष्ट्रीय बरोबरच देशांतर्गत बाजारात साखरेचे दर चांगले राहतील.
भीमाशंकर सहकारी साखर कारखाना डिस्टीलरी प्रकल्पाची उभारणी करणार असून, सहवीजनिर्मिती प्रकल्पाचे विस्तारीकरण करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे गृहमंत्री आणि भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक संचालक दिलीप वळसे पाटील यांनी केले.
आंबेगाव तालुक्यातील दत्तात्रयनगर, पारगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या आणि दत्तात्रय ऊस तोडणी वाहतूक संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कारखान्याचे संस्थापक संचालक व राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील बोलत होते.
कारखान्याची 2020-21 ची 25 वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाइन पध्दतीने दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत आणि कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष विष्णूकाका हिंगे, पूर्वा वळसे पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सभापती सुभाषराव मोरमारे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम,
पंचायत समितीचे सभापती संजय गवारी, कारखान्याचे संचालक प्रदीप वळसे पाटील, अशोक घुले, रामचंद्र ढोबळे, दादाभाऊ पोखरकर, दगडू शिंदे, शांताराम हिंगे, बाळासाहेब थोरात, आण्णासाहेब पडवळ, भगवान बोऱ्हाडे, तानाजी जंबूकर, अक्षय काळे, ज्ञानेश्वर अस्वारे,
रमेश कानडे, रमेश लबडे, किसन उंडे, कल्पना गाढवे, मंदाकिनी हांडे, जनाबाई आजाब, आनंदराव शिंदे, सखाराम घोडेकर, वसंतराव भालेराव, प्रकाश घोलप, गणपतराव इंदोरे, सूर्यकांत थोरात उपस्थित होते.
यावेळी दिलीप वळसे पाटील म्हणाले, केंद्र सरकारने साखरेचा किमान विक्री दर जाहीर केला; परंतु मध्यंतरीच्या काळात आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत बाजारात साखरेचे दर कमी असल्याने साखरेची विक्री झाली नाही. त्यामुळे गोडाऊनमध्ये साखर पडून राहिल्याने बॅंकेच्या कर्जावरील व्याजाचा बोजा वाढतच गेला.
परिणामी बऱ्याच साखर कारखान्यांना तोट्यात साखर विक्री करावी लागली. सद्यःस्थितीत आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत बाजारात साखरेस चांगला भाव मिळत असल्याने विक्री होत आहे. उत्पादन वाढीसाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट, मांजरी बु. यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तात्रय वळसे पाटील ऊस उत्पादकता वाढ लक्ष 130 मे.टन योजनेअंतर्गत विविध सोयी सवलती
दिल्यामुळे फलस्वरूप शेतकऱ्यांच्या एकरी उत्पादनात वाढ होऊन कार्यक्षेत्र व परिसरात ऊसाचे क्षेत्र वाढले आहे, यावेळी कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले व कारखान्याचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गावडे यांनी आभार मानले.
गाळप हंगाम 2020-21 मध्ये 6000 टीसीडी विस्तारीकरणाचे काम करोना आजाराच्या पार्श्वभूमीवर आव्हानात्मक असताना यशस्वीरित्या पूर्ण करून उच्चांकी 9 लाख 69 हजार 920 मे. टन गाळप करून 10 लाख 91 हजार 538 क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे.
11.24 टक्के साखर उतारा मिळाला आहे. सहवीजनिर्मिती प्रकल्पामार्फत 7 कोटी 13 लाख 69 हजार युनिटचे उत्पादन होऊन वापर वजा जाता 4 कोटी 16 लाख 4 हजार युनिट वीज वितरण कंपनीस निर्यात केले आहे.
– बाळासाहेब बेंडे, अध्यक्ष, भीमाशंकर कारखाना