पुणे – महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि इतर साखर उत्पादन करणाऱ्या राज्यांत विविध कारणांमुळे बरेच साखर कारखाने बंद आहेत. त्यांना पुनरुज्जीवितकरून त्याठिकाणी इथेनॉल निर्मितीचे प्रकल्प सुरू करण्याचा विचार सुरू आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने यासाठी पुढाकार घेतला आहे. सध्या देशात 25 हजार कोटी रुपयांचे इथेनॉल तयार केले जाते. भारतात 1 लाख कोटी रुपयांचे इथेनॉल तयार करण्याची क्षमता आहे. जर पूर्णक्षमतेने इथेनॉलचे उत्पादन झाले तर भारत वर्षाला 7 लाख कोटी रुपयांच्या क्रुड आयातीची बचत करू शकतो.
बंद साखर कारखान्यातील 5 ते 6 एकर जागेचा वापर इथेनॉल निर्मितीसाठी केला जाऊ शकतो. साखर, उसाचा रस, मळीपासून इथेनॉल तयार करण्याचे धोरण तयार करणे आवश्यक आहे. याकरिता भांडवल उपलब्ध होऊ शकेल. त्यासंबंधात रस्ते वाहतूक मंत्रालय पेट्रोलियम मंत्रालयाच्या संपर्कात आहे.
महाराष्ट्राबरोबरच उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब आणि हरियाणात हा प्रयोग केला जाऊ शकतो. पेट्रोल आणि डिझेल वाहनावर बंदी घालण्याचा सरकारचा कसलाही विचार नाही. मात्र, पर्यायी इंधनाकडे आपण लक्ष देणे गरजेचे आहे.