राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बैठकीतील निर्णय
मुंबई : महाराष्ट्र सरकार एल्गार परिषद प्रकरणाची समांतर चौकशी करणार आहे. एनआयएसोबत एसआयटीमार्फत (विशेष तपास पथक) या प्रकरणाची चौकशी होणार आहे. राज्य सरकार लवकरच एसआयटीची स्थापना करणार आहे. मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटरमध्ये झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बैठकीत एल्गार प्रकरणाच्या तपासाबाबत निर्णय झाल्याची माहिती पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
गृहमंत्री अनिल देशमुख कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन एल्गार परिषद प्रकरणी एसआयटी स्थापन करतील. एसआयटी स्थापन करण्यासंदर्भात शरद पवारांनी राज्य सरकारला पत्र दिले होते. राज्य सरकार एल्गार परिषदेसंदर्भात समांतर एसआयटी स्थापन करु शकते, एनआयएच्या कलम 10 नुसार वेगळी समिती स्थापन करण्याची तरतूद आहे, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली.
काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे एल्गार प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याची मागणी केली होती. मात्र त्यानंतरही मुख्यमंत्र्यांनी एल्गारचा तपास एनआयएकडे दिल्याने शरद पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख नाराज झाले होते. त्यामुळे विरोधकांनी महाविकास आघाडीच्या सरकारवर प्रश्नचिन्ह उभे केले होते. मात्र आमच्यात महाराष्ट्र विकास आघाडीत कोणताही वाद नाही, भाजपाला सत्तेत राहण्याचा रोग झाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात वाद असल्याचाही अपप्रचार केला जात आहे असा आरोप राष्ट्रवादीने केला.
एल्गार परिषद प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी होकार दिल्यानंतरही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी स्वतंत्र चौकशीची मागणी लावून धरली होती. एनआयएकडून तपास करणे हा केंद्राचा अधिकार आहे, मात्र राज्याला देखील अधिकार आहेत. राज्य सरकारला विश्वासात घ्यायला पाहिजे. कोरेगाव-भीमा प्रकरण घडलं त्यावेळी फडणीस सरकार होतं. त्यामुळे या घटनेत काहीतरी लपवण्यासारखं असेल म्हणूनच केंद्राने हा तपास एनआयएकडे दिला आहे, असा आरोप शरद पवारांनी केला.