सातारा – महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण व मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत जिल्हा व तालुका स्तरावर राष्ट्रीय विधी सेवा दिन दि. 9 ते 23 नोव्हेंबर या कलावधीत साजरा करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांमध्ये विधी सेवा केंद्राची स्थापना केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव, न्यायाधीश प्रवीण कुंभोजकर यांनी दिली आहे.
न्यायाधीश निकम, सातारा बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. अरुण खोत, उपाध्यक्ष संग्राम मुंडेकर उपस्थित होते. 9 नोव्हेंबर रोजी जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये विधीज्ञ, न्यायालयीन कर्मचारी, विधी स्वयंसेवक, शालेय विद्यार्थी सहभागी होणार आहे. राष्ट्रीय विधी सेवा दिनानिमित्त मुख्यालयामध्ये पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावर, पोलीस स्टेशन, मंडई या ठिकाणी विधी सेवा मदत कक्ष उभारण्यात येणार आहेत.
कायदे विषयक जनजागृती व्हावी यासाठी पंचायत समिती, तहसील कार्यालय, एसटी बसस्थानक, कौटुंबिक न्यायालय, जकातवाडी व करंजे येथे पथनाट्य सादर करण्यात येणार आहे. कायदे विषयक जनजागृतीसाठी सातारा येथील आकशवाणी केंद्र परिसर, सोनगाव, माहुली, महागाव, प्रतापसिंहनगर, बसाप्पा पेठ, लक्ष्मी टेकडी, सैदापूर व म्हसवे येथे घरोघरी जाऊन माहितीपत्रके वाटण्यात येणार आहेत.
16 नोव्हेंबर रोजी महिलांसाठी विधी साक्षरता शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सातारा तालुक्यातील पोलीस स्टेशनमध्ये विधी सेवा केंद्रे सुरू करण्यात येणार असून ही केंद्रे आठवड्यातून तीन दिवस कार्यरत राहणार आहेत. बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याविषयी जनजागृती होण्यासाठी पहिल्या टप्प्यात सातारा तालुक्यातील माध्यमिक व पूर्व माध्यमिक शाळांमध्ये 100 सत्रांमध्ये शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी आठ महिला विधिज्ञांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे कुंभोजकर यांनी सांगितले.
“मनोधैर्य’वर 22 लाख खर्च
अत्याचाराच्या गुन्ह्यातील पीडित महिला, मुलींनी अन्यायाविरोधात पुढे यावे यासाठी शासनाने “मनोधैर्य’ योजना आणली आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यात 76 पीडित महिलांना 22 लाख रुपयांची मदत देण्यात आल्याची माहिती कुंभोजकर यांनी दिली.