669 अर्ज दाखल : 11 फेब्रुवारी रोजी निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार
बारामती, दि. 23 (प्रतिनिधी) – माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत 21 जागांसाठी 369 अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी गुरुवारी (दि. 23) दिग्गजांनी आपले अर्ज दाखल केले. शुक्रवारी (दि. 24) उमेदवारी अर्जाची छाननी होणार असून मंगळवार (दि. 27) तारखेपर्यंत अर्ज माघारी घेता येणार आहेत. उमेदवारांची अंतिम यादी दि. 11 फेब्रुवारी रोजी सादर होणार आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची सर्वाधिक उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. अनुभवी दिग्गजांसह माळेगावच्या निवडणुकीसाठी तरुणांनी देखील अर्ज दाखल केले आहेत. योगेश जगताप, नितीन सातव, प्रशांत सातव तसेच संदीप चोपडे आदींसह तरुणांनी मोठ्या संख्येने अर्ज दाखल केले आहेत. 21 जागांसाठी 369 अर्ज दाखल झाले असले तरी दि. 11 फेब्रुवारी रोजी निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बरोबरच तरुणांनाही संधी देणार असल्याचे स्पष्ट केले आहे, त्यामुळे राष्ट्रवादीच्या वतीने कोणाला संधी मिळणार कोणाचा अर्ज राहणार व कोणाला माघार घ्यावी लागणार याची उत्सुकता लागली आहे.
यंदा चंद्रराव तावरे गटातून देखील इच्छुकांचा आलेख वाढला आहे, त्यामुळे या गटातून देखील कोणाला संधी मिळणार व कोणाला अर्ज माघारी घ्यावे लागणार हे देखील महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी बरोबरच चंद्रराव तावरे गटालादेखील नाराज उमेदवारांची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार हे नक्की.