कराड – कराड शहरातील सर्वपक्षीय माजी नगरसेवकांनी एकत्रित येऊन गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर माजी नगरसेवक विचारमंचची स्थापना केली. या मंचच्या माध्यमातून शहरातील अनेक प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे. यावेळी झालेल्या बैठकीत मंचच्या कार्यकारणीची निवड करण्यात येऊन राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांविषयी चर्चा करण्यात आली. तसेच सर्व सणोत्सव मोठ्या उत्साहाने साजरे करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीसाठी ज्येष्ठ माजी नगरसेवक राजाभाऊ देशपांडे, अशोकराव पाटील, माधवराव पवार, सुभाषराव डुबल, नंदकुमार बटाणे, मानसिंगराव पाटील, संभाजी सुर्वे, शब्बीर शेख, बाळासाहेब उमराणी, अमृत देशपांडे, दीपक बेलवणकर, घन:श्याम पेंढारकर, मोहनराव शिंदे, विजय मुठेकर, रामभाऊ रैनाक, महादेव पवार, विनायक विभूते, प्रदीप जाधव, प्रकाशराव जाधव यांच्यासह सुमारे चाळीसहून अधिक माजी नगरसेवक उपस्थित होते.
माजी नगरसेविका प्रा. शारदा गंधे यांचे नुकतेच निधन झाले. त्यानिमित्ताने एकत्रित आलेल्या नगरसेवकांनी आपली एक संघटना तयार झाल्यास सुख:दुखाच्या कार्यात आपण पुन्हा एकत्रित येऊन आपल्यासह इतरांचेही प्रश्न सोडवले जातील असा मुद्दा पुढे करण्यात आला. त्यातूनच गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर एक विचाराने एकत्रित आलेल्या माजी नगरसेवकांनी विचारमंचची स्थापना केली. या माध्यमातून विविध सामाजिक प्रश्न सोडविले जाणार आहेत. तसेच जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ही संघटना राजकारणापासून पूर्णपणे अलिप्त राहणार असल्याचे सांगितले. यावेळी काहींनी आपली मनोगते व्यक्त केली. संघटनेच्या स्थापनेबाबत समाधान व्यक्त करत आज याची गरज असल्याचे सांगितले. जिथे नगरपालिका कमी तेथे आमी असेही काहींनी सांगितले.
सध्या घरपट्टी व पाणीपट्टीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. कराड शहरातील कर हे पुण्यासारख्या मोठ्या शहरापेक्षाही जास्त आहे. याबाबत आवाज उठवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. तसेच पाणपोई, टोलनाक्यावरील अडवणूक याबाबतीत चर्चा करण्यात आली. येत्या 14 एप्रिल रोजी आंबेडकर जयंती व शिवजयंती एकत्रितपणे दिमाखात साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला. माजी ज्येष्ठ नगरसेवक राजाभाऊ देशपांडे यांचा 98 वर्षीही असणारा उत्साह प्रेरणादायी असल्याचे शब्बीर शेख यांनी व्यक्त केले.