नवी दिल्ली – उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसने शुक्रवारी छाननी समिती स्थापन केली. जितेंद्र सिंह यांच्या अध्यक्षतेखालील त्या समितीमध्ये महाराष्ट्राच्या मंत्री वर्षा गायकवाड यांचा समावेश करण्यात आला आहे.
उत्तरप्र देशात पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यासाठी सज्ज झालेल्या कॉंग्रेसने इच्छूक उमेदवारांची छाननी करण्यासाठी समिती निश्चित केली. त्या समितीच्या सदस्यांमध्ये खासदार दिपेंदरसिंह हुडा, पक्षाचे उत्तर प्रदेश प्रदेशाध्यक्ष अजयकुमार लल्लू आणि आराधना मिश्रा यांचा समावेश आहे. ती समिती संभाव्य उमेदवारांची छाननी करून त्यांची नावे अंतिम निश्चितीसाठी पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवेल.
उत्तरप्रदेश निवडणुकीला ताकदीने सामोरे जाण्याची रणनीती कॉंग्रेसने आखली आहे. कॉंग्रेसच्या निवडणूक सज्जतेवर पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी स्वत: देखरेख ठेऊन आहेत. कॉंग्रेस एकट्याच्या बळावर लढणार की इतर पक्षांशी आघाडी करणार ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. तूर्त, पक्ष संघटना मजबूत करण्याला आणि जनतेपर्यंत पोहचण्याला कॉंग्रेसने प्राधान्य दिले आहे.