नवी दिल्ली : औषधे व लसींच्या चाचण्यांसंदर्भात काम करण्यासाठी एका उच्च स्तरीय कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. नीती आयोग सदस्य आणि पंतप्रधानांचे प्रमुख शास्त्रीय सल्लागार या दलाचे सहअध्यक्ष आहेत. लस निर्मितीसाठी सर्व मंत्रालयांकडून सुरू असलेल्या कामामधील समन्वयाला हे कृती दल गती देईल, अशी माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अगरवाल, गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्या पुण्य सलिला श्रीवास्तव आणि “आयसीएमआर’चे प्रवक्ते रमण गंगाखेडकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
कोविड-19 वर लस विकसित करण्यासाठी 17 गट काम करत आहेत, त्यापैकी 5 गटांनी प्राण्यांवरील अभ्यासाचा टप्पा पूर्ण केला असून मानवावरील परिणाम तपासून पाहात आहेत. यातील एक ऑक्सफर्ड वॅक्सीन गटाने केलेल्या अभ्यासातून काढलेल्या निष्कर्षांचा विचार करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
आज देशभरात 31 जणांचा मृत्यू झाला. तर करोनाबाधितांच्या संख्येने 16 हजारांचा टप्पा पार केला. आज देशात मृत्यू झालेल्या 31 जणांमध्ये गुजरात आणि महाराष्ट्रातून प्रत्येकी 10, पंजाब आणि उत्तर प्रदेशमधील प्रत्येकी तीन, पश्चिम बंगालमधील दोन आणि दिल्ली, मध्य प्रदेश आणि कर्नाटकमधील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. एकूण 519 मृत्यूंपैकी महाराष्ट्रात सर्वाधिक 211 मृत्यू झाले आहेत. त्यानंतर मध्य प्रदेश (70), गुजरात (58), दिल्ली (43) आणि तेलंगणा (18) यांचा समावेश आहे.