सातारा: करोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सातारा जिल्ह्यात कडक प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यतील अत्यावश्यक बाबी वगळता सर्व प्रकारची दुकाने व आस्थापना पुढील आदेशापर्यंत बंद राहतील तर अत्यावश्यक सेवेची सुरु असणारी सर्व दुकाने ठरविक वेळेत सुरु राहतील, असे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले.
जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशानुसार अत्यावश्यक सेवेची सुरु ठेवलेली सर्व दुकाने (उदा. किराणा सामान, दूध, औषध दुकाने, कृषी सेवा केंद्रे व अन्य जीवनावश्यक वस्तूं) दि. ११ एप्रिलपासून पुढील आदेशापर्यंत रोज सकाळी ८ ते सकाळी ११ वाजेपर्यंत व सायंकाळी ७ वाजल्यापासून ते ९ वाजेपर्यंतच सुरु राहतील.* तथापि भाजीपाला विक्री केंद्रे फक्त सकाळी ८ ते ११ या वेळेतच सुरु राहतील. भाजीपाला केंद्रे संध्याकाळी चालू राहणार नाहीत.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द नियमानुसार कडक कारवाई करण्यात येऊन संबंधितांचा परवाना तात्काळ कायमस्वरुपी रद्द करण्यात येऊन साथरोग प्रतिबंधात्मक कायद्यानुसार, दंड प्रक्रिया संहिताचे कलम १४४, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ या आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहिता कलम १८८ नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.