ओतूर (प्रतिनिधी) – जुन्न्नर तालुक्यात 80 टक्के पेरण्या झाल्या आहेत. मात्र, पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकरी पुरता हबकला आहे. करोना, लॉकडाऊननंतर आता पाऊस लांबणीवर गेल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे वादळ घोंगावले आहे. करोनामुळे शेतीमाल सडून गेला आहे.
जुन्नर तालुक्यावर करोना महामारीच्या संकटाची टांगती तलवार कायम असताना निसर्ग चक्रीवादळाने उभी पिके भुईसपाट झाली आहेत. केळी, ऊस, द्राक्षबागा, आंबा, चिक्कू, टोमॅटो, मिरची, भाजीपाला आदी पिकांचे नुकसान झाले आहे. खरीप हंगामासाठी मान्सूनमध्ये पहिल्याच पावसानेही दांडी मारल्यामुळे बळीराजाची धाकधूक वाढली आहे. करोना, निसर्ग चक्रीवादळ आदी एकापाठोपाठ संकटामुळे बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. परिसरातील 80 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत, बहुतांश पेरण्या केलेल्या शेतात रोपेही उगवून आली आहेत. या रोपांना पावसाची गरज आहे. मात्र, याचवेळी पावसाने हुलकावणी दिल्यामुळे रोपे करपून जाण्याची भीती व्यक्त होत आहे.
जून महिन्याची 22 तारीख उलटून गेली तरी यंदा उत्तर पुणे जिल्ह्याच्या टोकावर असलेल्या ओतूर परिसरातील चाळीस गावांमध्ये पावसाने हजेरी लावली नाही. काही दिवसांपूर्वी तुरळक झालेल्या पावसामुळे सोयाबीन, मूग, उडीद, तूर, भुईमूग आदी कडधान्याची पेरणी केली आहे. पेरलेले धान्य उगवून आले आहे. मात्र, पावसाची प्रतीक्षा करावी लागत असल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
लॉकडाऊनच्या काळात शेतीमाल शहराकडे विक्रीसाठी पाठवता आला नाही. जीवापाड जपलेली पिके बांधावर फेकून द्यावी लागली आहेत. चक्रीवादळाने शेतकरी आधीच उद्ध्वस्त झाला आहे. शेतकऱ्यानी महागड्या बी- बियाणांची जमवाजमव करून पेरण्याही केल्या आहेत. या पेरण्या वाया जाणार आहेत. त्यामुळे शेतकरी पुरता घायाळ झाला आहे, दुबार पेरणीचे संकट उभे राहिल्यास पुन्हा शेतीसाठीचे भांडवल कसे उभे करायचे? हा यक्ष प्रश्न बळीराजाला सतावत आहे.
जुन्न्नर तालुक्यात वेळेत पावसाचे आगमन झाले नाही तर दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांसमोर उभे राहण्याची शक्यता आहे.
– प्रा. हेमंतकुमार डुंबरे,
कीटकशास्त्र विभाग प्रमुख, कृषी महाविद्यालय, आंबी (जि.नगर)