मुंबई – राज्यतील नवीन सरकारने आरे मेट्रो प्रकल्पाला तातडीने मान्यता दिली आहे. त्यामुळे तेथील वन जमीनीचे व पर्यायाने मुंबईच्या पर्यावरणाचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे नवीन मुख्यमंत्र्यांनी हा प्रकल्प रद्द करावा अशी कळकळीची मागणी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी नवीन सरकारकडे केली आहे.
आरेचे हे जंगल 1800 एकराचे आहे आणि त्याचा उल्लेख मुंबईचे फुप्पुस असाही केला जातो. त्या संबंधात अदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे की, हा केवळ तेथे कारशेडसाठी पाडल्या जाणाऱ्या 2700 झाडांचा प्रश्न नाही तर मुंबईच्या जैववैविध्याचा प्रश्न आहे. तो जपण्याची गरज आहे. आरेच्या प्रस्तावित कारशेडच्या जागी अनेक वेळा बिबट्याचे दर्शन होते. अन्यही वन्य जीव तेथे दिसतात. त्यांची जपणूक पर्यावरणाच्यादृष्टीने अत्यंत महत्वाची असल्याचेही त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे.
या मेट्रो कारशेडच्या प्रकल्पामुळे मुंबईची वाचलेली वन्य संपदाही नष्ट होण्याची चिन्हे आहेत असेही त्यांनी म्हटले आहे. राज्य सरकारने तडकाफडकी हा जो निर्णय घेतला आहे, त्याने मला व माझ्या सारख्या असंख्य पर्यावरण प्रेमींना धक्का बसला आहे असेही अदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. पर्यावरणाचा घात करून होणारा विकास आम्हाला नको आहे असेही त्यांचे म्हणणे आहे.