कुठल्याही संस्कृतीवर त्या त्या भागातल्या आणि त्या काळातल्या भौगोलिक परिस्थितीचा पर्यावरणाचा आणि तिथं घडणाऱ्या हवामान बदलाचा मोठा परिणाम होत असतो. लडाखमध्ये संपूर्ण भारतापेक्षा वेगळी भौगोलिक परिस्थिती आहे. हवामानही वेगळे आहे म्हणूनच लडाखचा इतिहासही वेगळा आहे. निसर्ग वेगळा आहे.
लडाखचा हा निसर्ग आणि पर्यावरण जपणे, ही आपली सर्वांची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन “रानवाटा’ संस्थेच्या अध्यक्ष आणि लडाख परिसराच्या अभ्यासक ऍड. सीमान्तिनी नूलकर यांनी केले आहे.
निसर्ग आणि पर्यावरण संरक्षण व संवर्धन या क्षेत्रात काम करत असलेल्या, डॉ. वा. द. वर्तक यांनी स्थापन केलेल्या पुण्यातील महाराष्ट्र वृक्ष संवर्धिनी या संस्थेच्या “मिशन देवराई’ संकल्पने अंतर्गत दर महिन्याला निसर्ग आणि पर्यावरण क्षेत्रातल्या तज्ज्ञ व्यक्तींचे स्लाइड शोज किंवा व्याख्यानं आयोजित केली जातात.
या उपक्रमाअंतर्गत यावर्षी “निसर्गविषयक पुस्तकांचा परिचय’ या ऑनलाईन व्याख्यानमालेत नूलकर यांचे “लदाख भारताचा अद्भुत मुकुटमणी’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी नूलकर बोलत होत्या. प्रिया सुनील भिडे यांनी सुरुवातीला नूलकर यांचा परिचय करून दिला.
नूलकर पुढे म्हणाल्या की, लडाखमध्ये वेगळ्याच प्रकारची जैवविविधता आढळून येते. अति उंचीवरचे शीत रण, अती उंचीवरची शेतं, अति थंड प्रदेश, अति उंचीवरचे दलदलीचे प्रदेश, स्थलांतरित पक्ष्यांची प्रजनन भूमी आणि स्थलांतरादरम्यानचा मुक्कामाचा महत्त्वाचा टप्पा अशी लडाखची अनेक वैशिष्ट्ये आहेत. लदाखमधले पुष्पसौंदर्य, तिथले हिम बिबळ्या, मरमॉट, चिरु यासारखे प्राणी, जुनिपर, भूर्ज वृक्ष या सारखे वनस्पती विश्व आणि सूक्ष्म जीवविश्व अनोखं आहे. लदाखमधील लोकसंस्कृती तिथल्या याक घोडे पश्मिना मेंढ्या अशा प्राण्यां भोवती आणि लडाखमध्ये फुलणाऱ्या अनेक फुलांभोवती गुंफलेली आहे.
लडाखचा निसर्ग आणि तिथल्या लोकसंस्कृतीचा परिचय नूलकर यांनी स्लाइड शोच्या माध्यमातून करून दिला. ग्लोबल वॉर्मिंगमुळे, माणसाच्या निसर्गातील हस्तक्षेपामुळे, लदाखवर ही परिणाम झालेला आहे. इथली ग्लेशियर्स मागे हटली आहेत. हिमवर्षाव कमी झालेला आहे.
निसर्गाचेही मूलभूत हक्क असतात. आपले अस्तित्व राखण्याचा आणि निसर्गचक्र अबाधित राखण्याचा हक्क निसर्गाला आहे. त्यावर माणसांनी अतिक्रमण केलेले आहे. त्या अर्थाने निसर्ग ही “इनजुअर्ड पार्टी’ आहे. त्यामुळे निसर्गाला न्याय मिळवून देणं, निसर्गासाठी वकिली करणं गरजेचं आहे. निसर्गाविषयी आत्मियता निर्माण व्हावी, जवळीक निर्माण व्हावी, विध्वंसाची प्रवृत्ती कमी व्हावी हा “मिशन देवराई’ या संस्थेचा आणि सीमंतीनी नूलकर याचा उद्देश या व्याख्यानामुळे सफल झाल्याची भावना सहभागींनी व्यक्त केली.