रोज संध्याकाळी मावळणारा सूर्य हा दुसऱ्या दिवसाच्या पहाटेला न चुकता ठराविक वेळी प्राचीवर उगवतो. हे त्या निसर्गातले एक आश्चर्यच आहे. त्यात कधीही खंड पडलेला नाही आणि तो पुढेही कधीच पडणारही नाही. त्याचं ते प्राचीवरचं तांबूस सूर्यबिंब हे जेव्हा सारी पूर्व दिशा उजळून टाकते त्या वेळची त्या आकाशाची रम्य शोभा ही काही विलक्षण दिसते, आपले चित्त आकर्षित करून घेते.
बरं, तो नुसता येत नाही तर त्याची ती सूर्यकिरणे जेव्हा धरणीवर झेपावतात. तेव्हा ती किरणे धरणीमातेने ओढून घेतलेली अंधाराची चादर दूर करतात आणि सारी सृष्टी, सारं चराचर जागं करतात. त्या वेळी खरं तर तुमच्या आमच्या जीवालाही नैसर्गिकच जाग आलेली असते. पण आपण मात्र आळस, कंटाळा, टाळाटाळ दाखवत पुन्हा झोपेची चादर डोक्यावर ओढून घेतो आणि झोपतो.
ती झोप असते अज्ञानाची. खरी ज्ञानाची जाग ही त्या सूर्यनारायणाने घातलेल्या पहिल्या हाकेलाच आलेली असते. ती हाक तो घालतो पक्ष्यांच्या किलबिलाटातून, वाऱ्यावर येणाऱ्या सुगंधित झुळकेतून. त्या वेळी कुठंतरी दूर मंदिरात होणारा घंटानाद कानी पडतो आणि कानावर पडतात ते पहाटेचे भूपाळीचे सूर.
धनश्याम सुंदरा श्रीधरा। अरुणोदय झाला।
उठी लवकरी वनमाळी सदया। रवि मित्र आला।।
मात्र, हे असं भूपाळी म्हणून त्या मंदिरातल्या देवास जागे करत असताना खरे तर आपण प्रत्येकाने आपल्या देहातील त्या चैतन्याला, चेतनेला क्रिया शक्तीला जागे करून तिला कार्यान्वित करायला हवे. ती कार्यशीलता आपल्याला या सूर्याकडून शिकायची असते. त्या बरोबर तो आपल्याला हेही शिकवित असतो की, जसा प्रकाशाने अंधाराचा नाश होतो त्या प्रमाणेच ज्ञानसूर्याच्या उदयाने तुमचे जीवनही उजळते. उगवणाऱ्या दिवसा बरोबर लोक कामाला लागतात.
त्यासाठी आपण जागं व्हायचं असतं ते विवेक विचारांनी. कामातून घाम आणि घामातून मोती पिकतात हे लक्षात घ्यायला हवे. प्रत्येकाच्या अंगी उद्योगशीलता क्रियाशीलता ही हवीच. कारण जिथे उद्योगशीलता आहे, काम आहे, कष्ट आहे तिथे त्या श्रमलक्ष्मीच्या साधनेने धनलक्ष्मीचा प्रसाद हा न मागता मिळत असतो. पण त्याच्या प्राप्तीसाठी आपण मात्र खऱ्या अर्थाने जागे व्हायला लागते.