नवी दिल्ली – पर्यावरणाच्या नियमाचा भंग केल्याबद्दल दिल्ली सरकारने फिक्की या उद्योजकांच्या संघटनेला 20 लाख रुपयांचा दंड केला आहे.
तानसेन मार्गावर एक इमारत पाडली जात असताना धूळ नियंत्रित करण्याच्या नियमांचा भंग केल्याबद्दल हा दंड आकारण्यात आला आहे. फिक्कीने दंडाची रक्कम 15 दिवसांच्या आत जमा करावी, असे आदेश देण्यात आले आहेत.
धूळ नियंत्रित करणारी यंत्रणा उपलब्ध असल्याशिवाय कोणतीही इमारत पाडू नये, अशी सूचना दिल्ली सरकारने दिलेली आहे. संबंधित इमारत पाडताना आवश्यक ती काळजी घेतली नाही. आगामी काळात काळजी घेतली नाही तर इतर कायदेशीर उपाय करण्यात येतील, असे दिल्लीचे पर्यावरणमंत्री गोपाल राय यांनी सांगितले. दिल्लीत प्रदूषणाचा प्रश्न वाढला आहे. त्यामुळे प्रदूषण करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले.