मुंबई :आज १४ एप्रिल २०२२ महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे. पिढ्यानपिढ्या जातीपातीच्या जोखडात अडकलेल्या, सगळ्याच पातळ्यांवर मागास राहिलेल्या पददलित समाजाला त्याच्यावरच्या अन्यायाची जाणीव करून देत, संघर्ष करण्यासाठी उभं राहण्याची प्रेरणा देण्याचं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य अजोड आहे. त्यांच्या जयंती निमित्त आज मुंबईतील चैत्यभूमीवर या महामानवाला अभिवादन करण्यासाठी भीमसागर लोटला आहे.
दोन वर्षाच्या करोना काळानंतर आज डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत आहे. महामानवाला अभिवादन करण्यासाठी आज सकाळपासूनच इथे भीमसागर लोटला आहे.
दरम्यान, डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चैत्यभूमीवर दाखल झाले तसे त्यांनी बाबासाहेबांना विनम्र अभिवादन केले.
दरम्यान, करोनामुळे गेली दोन वर्षे जयंती साधेपणाने साजरी करण्यात येत होती. मात्र यंदा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहाने पण आरोग्याची काळजी घेऊन साजरी करू असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. करोनाचे सावट कमी झाले आहे, मात्र आरोग्याच्या नियमांचे पालन करून हा जयंती उत्सव आपण उत्साहाने साजरा करूयात, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल आयोजित बैठकीत सांगितले होते.