हिमांशू
तर… अशा प्रकारे मनोरंजन पुढे चालूच राहणार आहे. आपल्याला आता कोण हसवणार आणि कोण एक्साइटमेन्ट देणार, याची चिंता सर्वसामान्यांनी सोडून दिली पाहिजे. भारताची डबघाईला आलेली अर्थव्यवस्था हे चिंतेचं मूळ कारण असल्याचं काहीजण कानीकपाळी ओरडून सांगत असले, तरी त्यात काही तथ्य नाही. अर्थव्यवस्था म्हटल्यावर चढउतार राहणारच. त्यात चिंता कसली करायची? अर्थव्यवस्था वगैरे विषयांकडे आपलं लक्ष वारंवार जाईल आणि आपल्याला दुःख होईल, असं वर्तन राजकारणाच्या क्षेत्रातल्या व्यक्तींनी केलं, तरच तो चिंतेचा विषय! अर्थव्यवस्था आज खाली गेलीय, तर उद्या ती वर येईलच. कांदा आज महाग झालाय, तर उद्या, परवा, कधीतरी स्वस्त होईलच. एक वेळ अशी येईल, की कांद्याचे ढिगारे मंडईत पडलेले दिसतील आणि खरेदीदार कुणी नसेल. त्या दिवसाची वाट पाहणं हे आपलं मुख्य काम आहे आणि प्रतीक्षेचा हा कालावधी सुसह्य करणं हे राजकारण्यांचं कर्तव्य आहे.
“कांदा रडवतोय आणि अर्थमंत्री हसवतायत,’ अशी कॅप्शन जेव्हा एका टीव्ही चॅनेलवर पाहिली, तेव्हा आम्ही कान टवकारले आणि डोळेही मोठ्ठे केले. अर्थमंत्री निर्मला सीतारामन या संसदेत नेमकं काय म्हणाल्या, हे कुतूहलानं ऐकू लागलो. एरवी संसदेत कुणी कितीही महत्त्वाचं बोलत असलं, तरी ते समजून घेण्याचा प्रयत्न आम्ही बिलकूल करत नाही. कशाला उगीच डोक्याला त्रास?
अर्थमंत्री म्हणाल्या, “”मी कांदा-लसूण कमी खाते. आमच्या कुटुंबात कांदा, लसूण वगैरेला फार महत्त्व दिलं जात नाही. त्यामुळं कांद्याच्या भाववाढीचा आमच्यावर काहीच परिणाम झालेला नाही.” ये हुई ना बात! कांदा साठवण्याची क्षमता वाढवण्यासाठी आम्ही तंत्रज्ञानाचा वापर करू आणि भाव नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करू, असंही त्या म्हणाल्या. परंतु एवढ्या किचकट गोष्टी कोण समजून घेणार? कांद्याची साठवणक्षमता वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणार म्हणजे नेमकं काय करणार, याची माहिती आम्हाला कशाला? आमच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे त्यांचं टाळ्यांचं वाक्य!
कांदा-लसूण कमी खाणारी कुटुंबं आपल्याकडेही खूप आहेत. काही कुटुंबांमध्ये चातुर्मासात कांदा-लसूण खात नाहीत. अर्थमंत्र्यांनी विनोद करून आम्हाला हसवलं हे खरं; पण त्याचबरोबर आम्ही कुणाचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवला पाहिजे, हेही सांगून टाकलं. “”ठेविले अनंते तैसेचि राहावे, चित्ती असू द्यावे समाधान,” अशी संतवचनं शतकानुशतकं ऐकून आम्ही सुधारलो नाही. अर्थमंत्र्यांनी तीच गोष्ट किती सोपी करून सांगितली बघा! आपला महाराष्ट्र मोठमोठ्या विनोदी लेखकांचा वारसा सांगतो. आपल्याच अडचणींवर आपण हसायला शिकलं पाहिजे, असं यातले काही लेखक सांगून गेले. वैताग कमी करण्याचं तंत्र शिकवून गेले. पण आम्ही शिकलो कुठं?
याच महाराष्ट्रभूमीत महिनाभर एक राजकीय नाटक रंगलेलं होतं. सरकार स्थापन झाल्यानंतर अखेरचा पडदा पडला, असं समजून आपण खट्टू झालो. पण ती एका अंकाची सांगता होती, असं सांगणाऱ्या कितीतरी घटना घडू लागल्यात. कुणीतरी नाराज असल्याच्या, कुठूनतरी कुठेतरी जाणार असल्याच्या चर्चा रंगल्यात. कुणी निर्णयाच्या तारखाही दिल्यात. त्या तारखांची आपण वाट पाहू शकतो, तर कांदा स्वस्त होण्याची वाट का पाहू शकत नाही? तोपर्यंत मनोरंजन होणं महत्त्वाचं!