मुंबई – वर्ध्यातील हिंगणघाटात शिक्षिकेला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. यात भाजलेल्या तरुणीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर नागपूरमधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यावर खासदार छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी फेसबुक पोस्ट लिहून संताप व्यक्त केला आहे. आयुष्याची स्वप्न डोळ्यासमोर असणाऱ्या एका तरुण प्राध्यापिकेला भररस्त्यात जिवंत पेटवलं गेलं. हा क्रुरतेचा कळस झाला. हे जरा अतिच होत आहे. आता बस्स! सहनशीलतेचा कडेलोट होत आहे, असे छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी लिहिले आहे.
काय आहे फेसबुक पोस्ट ?
माणूसपणाला काळीमा फासणारी घटना. हे वाक्य फार हलकं वाटेल अशी घटना सोमवारी हिंगणघाट येथे घडली.
त्या नराधमाचा एन्काऊंटर करण्याची मागणी लोक करत असतील तर ते समजण्यासारखे आहे.आयुष्याची स्वप्न डोळ्या समोर असणाऱ्या एका तरुण प्राध्यापिकेला भररस्त्यात जीवंत पेटवलं गेलं. हा क्रुरतेचा कळस झाला. हे जरा अतीच होत आहे. आता बस्स! सहनशीलतेचा कडेलोट होत आहे.
महाराष्ट्र कोणत्या दिशेला वाटचाल करत आहे? हाच का तो शिवरायांचा स्त्रीविषयक आदर्श डोळ्यासमोर ठेवणारा महाराष्ट्र? हाच का तो शाहू फुले आंबेडकरांचा स्त्री पुरुष समानता ठेवणारा मानवतावादी, पुरोगामी महाराष्ट्र? हाच का तो परस्त्री सदा बहिणी- माया म्हणणारा साधू संतांचा महाराष्ट्र? आज जर महाराज असते, तर ह्या असल्या नराधमाला कोणती शिक्षा केली असती? हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. लोकांना ते समजून जाईल. महाराष्ट्र पोलीसांनी हैद्राबाद पोलीसांचा आदर्श घ्यावा, अशी जनभावना तयार झाली आहे सध्या.
याशिवाय अश्या नरधमांच्यावर वचक बसणार नाही. आयुष्यात कुणा माता भगिनी कडे वाईट नजरेने बघण्याचं धाडसच काय, विचार सुद्धा मनात आला नाही पाहिजे. असं काही करण्याची गरज आहे. निर्भया असेल किंवा कोपर्डी च्या भगिनीला आज सुद्धा न्याय मिळलेला नाही. याची खंत आजही मनात आहे.
दरम्यान, हिंगणघाट येथील घटना ताजी असतानाच औरंगाबादमध्ये जळीतकांडाची पुनरावृत्ती झाली आहे. औरंगाबादमध्ये घरात घुसून एका महिलेवर रॉकेल ओतून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यामध्ये पीडिता ९० टक्के भाजली गेली आहे.