मॅंचेस्टर – बीसीसीआय व इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने (ईसीबी) भारत आणि इंग्लंडदरम्यान मॅंचेस्टर येथे होणारा पाचवा कसोटी सामना अखेर करोनाच्या भीतीमुळे रद्द केला आहे. हा सामना आता पुढील वर्षी जुलैमध्ये भारतीय संघाच्या इंग्लंड दौऱ्यात खेळवण्यावर विचार केला जाऊ शकतो असेही सांगण्यात येत आहे.
भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षख रवी शास्त्री, भरत अरूण व नितिन पटेल हे करोनाबाधित आढळले होते. त्यांना विलगीकरणात पाठवले गेले होते. त्यावेळी साहाय्यक फिजिओ योगेश परमार हे खेळाडूंबरोबर होते व त्यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे पाचव्या सामन्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. अखेर ही अनिश्चितता संपूष्टात आली व करोना वाढीचा धोका पाहता खेळाडूंच्या सुरक्षेला प्राधान्य देत हा सामनाच रद्द केला गेला आहे.
बीसीसीआय आणि ईसीबीच्या अधिकाऱ्यांनी पाचव्या कसोटीसंदर्भात गुरुवारी आणि शुक्रवारी सविस्तर चर्चा करुन सर्व शक्यतांचा विचार केला मात्र, भारतीय संघातील खेळाडूंनीच हा सामना खेळवण्यात येऊ नये अशी भीमीका गेतल्याने दोन्ही देशांच्या क्रिकेट मंडळांना सामना रद्द करण्याशिवाय पर्यायच राहीला नाही. दोन्ही देशांच्या क्रिकेट मंडळांच्या सदसंनी चर्चा करून सामन्याला काही तास शिल्लक असताना करोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो या भीतीने सामना रद्द केला.
भारतीय संघाच्या सपोर्ट स्टाफमधील सदस्य करोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने करोनाबाधितांची संख्या वाढण्याची भीती असल्याने हा सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला, असे स्पष्टीकरण ईसीबीने दिले आहे.
भारतीय संघाचे साहाय्यक फिजीओ परमार हे सातत्याने खेळाडूंसह होते तसेच ते पॉझिटिव्ह आढळल्यामुळे खेळाडूंनाही धोका होऊ शकतो असा विचार करत खेळाडूंच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले. त्यानंतर भारतीय संघातील खेळाडूंची एक बैठक झाली. या बैठकीमध्ये संघातील अनेक खेळाडूंनी पाचवा कसोटी सामना खेळण्याच्या विरोधात मत व्यक्त केले. हा सामना झाल्यावर खेळाडू अमिरातीला रवाना होणार आहेत. अमिरातीमध्ये येत्या 19 सप्टेंबरपासून आयपीएल स्पर्धेतील उर्वरीत सामने खेळवले जाणार असून त्या स्पर्धेला कोणताही धोका निर्माण होऊ नये यासाठी खेळाडूंनीच या सामन्याला विरोध केला. याच पार्श्वभूमीवर खेळाडू संसर्गाच्या भीतीने खेळण्याबद्दल फारसे उत्साही नसल्याचे समोर आल्यावर बीसीसीआयनेही खेळाडूंच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला. करोना पॉझिटीव्ह ठरलेले फिजिओ परमार हे रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, महंमद शामी व इशांत शर्मा यासारख्या खेळाडूंसोबत सातत्याने कार्यरत होते.
भविष्यामध्ये काय होणार आहे यासंदर्भात खेळाडूंच्या मनात भीती आहे. करोना संसर्ग झाल्यानंतर त्याची लक्षणं दिसण्यासाठी काही दिवसांचा कालावधी लागतो ही सुद्धा चिंता खेळाडूंच्या मनात असल्याचं चर्चेदरम्यान होती. पाचव्या कसोटीदरम्यान जर एखाद्या खेळाडूला संसर्ग झाल्याचे समोर आले तर संघातील सर्व खेळाडूंना विलगीकरणात पाठवले जाण्याचा एकमेव मार्ग होता त्यामुळे या खेळाडूंचा आयपीएलमधील सहभाग आणि त्यानंतर ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वकरंडकातही खेळण्याबाबत संकट निर्माण होण्याचाही धोका होता.
मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि गोलंदाजीचे प्रशिक्षक भरत अरुण यांच्यानंतर परमार यांना करोनाची लागण झाल्यामुळे भारतीय क्रिकेट संघाला गुरुवारचे सराव सत्र रद्द करावे लागले होते. संघातील सर्व खेळाडूंच्या करोना चाचण्या घेण्यात आल्या.
शास्त्री व कोहलीवर नाराजी
लंडनमध्ये रवी शास्त्री यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात अन्य व्यक्तींनीही उपस्थिती राखली होती. तीथेच शास्त्री यांना करोनाची बाधा झाल्याचे समोर आल्यावर त्यांच्यासह कर्णधार विराट कोहलीवरही बीसीसीआयने नाराजी व्यक्तस केली आहे. कोणतीही परवानगी न घेता हे सर्व घडल्यामुळे आता या दोघांवरही कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत.
इंग्लंड मंडळाची विचित्र मागणी
करोनाचा शिरकाव भारतीय संघात झारा असल्यामुळे हा सामना भारताने इंग्लंडला बहाल करावा, अशी विचित्र मागणी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने केली होती. ही मागणी फेटाळून लावली गेली असली तरीही पाचव्या कसोटीला रद्द करण्याच्या निर्णयावर साथानिक वृत्तपत्रांनी तसेच इंग्लंडमधील क्रिकेटप्रेमींनी टीका केली आहे. शास्त्री, अरुण आणि परमार यांना करोनाची लागण झाल्याने भारताचे सर्व खेळाडू सध्या विलगीकरणात आहेत. त्यामुळे भारताने जोखीम पत्करून कसोटी खेळण्याऐवजी इंग्लंडला विजय बहाल करावा, अशी मागणी होत होती. त्यावर बीसीसीआयने संताप व्यक्त केला होता. आता या मालिकेतील हा पाचवा सामना भारतीय संघाच्या पुढील जुलैमध्ये होश्रत असलेल्या इंग्लंड दौऱ्यात खेळवण्यावर विचार सुरु आहे. सध्या या मालिकेत भारतीय संघ 2-1 असा आघाडीवर आहे.