हेडिंग्ले – इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात पराभव झाल्यावर आता चौथ्या सामन्यासाठी भारतीय संघात किमान चार बदल होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. वेगवान गोलंदाज इशांत शर्मा, रवींद्र जडेजा, यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत व अजिंक्य रहाणे यांना डच्चू देण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
वेगवान गोलंदाज इशांत फारसा यशस्वी झालेला नसल्याने पूर्ण तंदुरुस्त ठरलेल्या शार्दुल ठाकूरचा समावेश करण्यात येणार आहे. पहिल्या तिन्ही कसोटी सामन्यांत अष्टपैलू जडेजाला यश मिळालेले नाही. त्यामुळे त्याच्या जागी रवीचंद्रन अश्विनला संधी दिली जाऊ शकते.
यष्टिरक्षक पंत यष्टिरक्षण आणि फलंदाजीत अपयशी ठरल्याने त्याच्या जागी एक जादा फलंदाज संघात घेऊन लोकेश राहुलला यष्टिरक्षणाची जबाबदारी दिली जाऊ शकते. हनुमा विहारीचा विचार केला जाणार असल्याचेही संकेत मिळत आहेत.
अजिंक्य रहाणे या मालिकेत सातत्याने अपयशी ठरला आहे. त्यामुळे त्याच्या जागी सूर्यकुमार यादवच्या नावाचा विचार होऊ शकतो.