दत्तात्रय आंबुलकर
1990 च्या सुमारास बिहारच्या ग्रामीण भागातील मानपूर या गावातील अनेक विद्यार्थ्यांना देशातील उत्तम संस्थेतून इंजिनिअर व्हावे असे वाटत होते, मात्र त्यांना नेमकी दिशा वा मार्गदर्शन मिळत नव्हते. मात्र, या तरुणांचे त्या दृष्टीने प्रयत्न सुरूच होते. अनेकजणांनी इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षेची तयारी अधिकाधिक प्रयत्नांसह सुरूच ठेवली.
त्यानंतर लवकरच म्हणजे 1992 मध्ये बिहारच्या मानपूर येथील जितेंद्र कुमार या विद्यार्थ्यास इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच आयआयटीच्या इंजिनिअरिंग अभ्यासक्रमात सर्वप्रथम प्रवेश मिळाला. आपल्या इच्छेनुसार आयआयटीत प्रवेश घेणाऱ्या जितेंद्र कुमारने मोठ्या उमेदीने इंजिनिअरिंगच्या अभ्यासक्रमाला सुरुवात करतानाच त्याहून अधिक महत्त्वाचे काम केले व ते म्हणजे गावातील इंजिनिअरिंग अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या संदर्भात मार्गदर्शन करण्याचे. जितेंद्र कुमार यांच्या या प्रयत्नांना गावच्या ब्रजबिहारी व भीमराज या शिक्षकांची साथ मिळाली व त्याचा फायदा मानपूरच्या इंजिनिअर होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या आयआयटी प्रवेशासाठी होऊ लागला.
त्यातच 1998 मध्ये जितेंद्र कुमारला इंजिनिअर म्हणून पुढील कामासाठी त्याच्या कंपनीतर्फे अमेरिकेला जाण्याची संधी मिळाल्याने तर मानपूरच्या विद्यार्थ्यांमध्ये आयआयटीतून इंजिनिअर होण्याची जणू स्पर्धा निर्माण झाली. आपल्यातीलच एक अशा जितेंद्र कुमारला यशस्वी इंजिनिअर म्हणून अमेरिकेत जाण्याची संधी मिळू शकते तर आपल्याला का नाही? या भूमिकेतून मानपूरची काही मुले तर 10वी उत्तीर्ण झाल्यापासूनच आयआयटी प्रवेशाची तयारी करू लागले. यातून गावाचे वातावरणच बदलून गेले. मानपूरमध्ये हातमाग व्यवसाय हा अनेक कुटुंबांसाठी उपजीविकेचे साधन होते.
घरच्यांना कामात मदत केल्यानंतर शाळेचा अभ्यास करण्यासाठी गावच्या देवळातील दिव्याच्या उजेडात अभ्यास पूर्ण झाल्यानंतर त्यातील काही विद्यार्थी आयआयटी प्रवेश परीक्षेचा सराव केल्यानंतरच घरी जात असत. त्यांच्या या प्रयत्नात अर्थातच ब्रजबिहारी व भीमराज यांचे पण सहकार्य व मार्गदर्शन मिळाल्याने मानपूरच्या विद्यार्थ्यांचे प्रयत्न अधिकाधिक फलदायी ठरू लागले. दरम्यान या अभ्यास-मार्गदर्शन व प्रयत्नांमुळे दरवर्षी मानपूरचा कमीत कमी 1 विद्यार्थी आयआयटीत इंजिनिअर होण्यासाठी दाखल होऊ लागला. त्यानुसार दरवर्षी गावातून इंजिनिअर होणाऱ्यांची संख्या वाढतच गेली.
या प्रयत्नांना व्यापक स्वरूप देण्यासाठी मानपूरच्या देवळात अभ्यास करून आयआयटीतून इंजिनिअर झालेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या पगार-उत्पन्नातून मोठी राशी एकत्रित करून गावातील विद्यार्थ्यांना अधिक उपयुक्त असे वाचनकक्ष वजा सभागृह बांधून दिले. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी बसण्याची चांगली व्यवस्था, मार्गदर्शक पुस्तकांचे वाचनालय इ.ची सोय केली आहे.