चॉंद शेख
दुष्काळ, हमीभाव, कर्जबाजारीपणा आदी कारणांनी संपविली जीवनयात्राका होत आहेत आत्महत्या
सिंचनाअभावी शेतकऱ्यांच्या आत्महत्या सर्वाधिक झाल्या आहेत.राज्यातील सिंचन क्षेत्र वाढले पाहिजे. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला हमीभाव दिला गेला पाहिजे.दिलेल्या कर्जाची परतावा दुष्काळामध्ये न घेणे, अत्याधुनिक यंत्राचं प्रशिक्षण देणे, खासगी सावकारकी पूर्णपणे बंद करणे, रोजगार हमी योजनेची बोगसगिरी बंद करून शेतकऱ्यांच्या हाताला काम दिले गेले पाहिजे. शेतकऱ्यांना जोडधंदा देणे आवश्यक आहे, त्यानंतरच शेतकरी आत्महत्येचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे.
नगर – सन 2001 ते 2019 या 19 वर्षाच्या काळात नगर जिल्ह्यातील तब्बल 807 शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे. त्यात गेल्या चार वर्षापासून सतत पडणारा दुष्काळ,शेतकऱ्यांना पिकांना न मिळालेला हमीभाव,शासकीय यंत्रणेची धोरणे व त्यातून डोक्यावर वाढत गेलेले कर्ज यामुळे 2014-15 पासून शेतकऱ्यांचे आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे.
विशेष म्हणजे याच काळात भाजप-शिवसेनेच्या युतीचे सरकार सत्तेवर होते. या काळात प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा आकडा शंभर ते दीडशेच्या घरात गेलेला आहे. त्यातच शासनदरबारी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला मिळणारी तुटपुंजी मदत जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार आहे.
सन 2001 ते 2019 या 19 वर्षाचा विचार करता सन 2006 मध्ये 41 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या दिसून येतात. त्यानंतर हा आकडा 2914 पर्यंत दोन आकडीच होता.14 मध्ये तसा तो वाढला आहे.तो 49 इतका आहे. त्यानंतर मात्र हा आकडा दरवर्षी वाढत गेला आहे. त्यातही 2016 ला सर्वाधिक 144 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.
या वर्षात हा आकडा नोव्हेंबरच्या मध्यालाच 112 पर्यंत पोहचला आहे. दुर्देवाने पुढील दीड महिन्यात तो वाढू नये! मात्र शासनाची कुचकामी धोरणे,सतत पडणाऱ्या दुष्काळासोबतच अवकाळीचे आस्मानी अन प्रशासकीय अनास्थनेचे सुलतानी संकट बळीराजावर सतत घोंगवत आहे.
या वर्षात 112 आत्महत्या
जानेवारी 2019 या वर्षात नोव्हेंबरपर्यंत 112 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यात 41 जण मदतीस पात्र ठरले आहेत, तर 39 जण अपात्र ठरले आहेत. 32 प्रकरणांची चौकशी प्रलंबित आहे. पात्र ठरलेल्या 41 जणांना शासनाची मदत मिळाली आहे. जानेवारीत 15, फेब्रुवारीत 10, मार्चमध्ये 12, एप्रिलमध्ये 11, मेमध्ये 17, जूनमध्ये 8, जुलैमध्ये 10, ऑगस्टमध्ये 8, सप्टेंबरमध्ये 9, ऑक्टोबरमध्ये 7 तर, नोव्हेंबरमध्ये 5 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.
कोणत्या कारणाने झाल्या आत्महत्या
महाराष्ट्र राज्यासह नगर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या होत आहेत त्याबाबत बंगलोरच्या नॅशनल मेंटल सोल्यूशन या संस्थने सर्वेक्षण केले आहे. त्यात 18 टक्के आत्महत्या शेतीमुळे, 20 टक्के आत्महत्या कर्जबाजारीपणामुळे, 20 टक्के आत्महत्या आर्थिक परिस्थिती खालवून कौटुंबिक वादातून झाल्या आहेत. 13 टक्के आत्महत्या आजारपणामुळे झाल्या आहेत.
पाच टक्के आत्महत्या दारूमुळे आणि 25 टक्के आत्महत्या इतर कारणामुळे झाल्या आहेत. 80 टक्के शेतकऱ्यांनी विषारी औषध घेवून व गळफास घेवून आत्महत्या केली आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांमध्ये 94 टक्के आत्महत्या या कुटुंबप्रमुखांच्या आहेत. झालेल्या आत्महत्यात जिल्ह्यातील 100 टक्के आत्महत्या पुरूषांच्या आहेत. 90 टक्के आत्महत्या विवाहितांच्या आहेत. 30 ते 59 या वयोगटातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या सर्वाधिक आहेत आणि गंभीर बाब म्हणजे झालेल्या आत्महत्यांमध्ये 98 टक्के आत्महत्या शेतीसाठी सिंचन नसल्याने झाल्या आहेत.
मुळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणे हे दुर्दैवी आहे. शासनपातळीवर त्याबाबत तातडीने मदतीचे प्रस्ताव सादर करून सदर कुटुंबास मदत मिळवून दिली जाते. गेल्या दोन-तीन महिन्यांतील अपवाद वगळता आतापर्यंतच्या पात्र शेतकऱ्यांना शासनाची मदत पोहचलेली आहे. प्रलंबित प्रकरणांची शहानिशा करून त्यांनाही मदत मिळून दिली जाईल.
-राहुल व्दिवेदी, जिल्हाधिकारी
शेती संकट व त्यामुळे झालेली शेतकऱ्यांची कोंडी आता केवळ विर्दभ-मराठवाड्यापुरती मर्यादित राहिलेली नसून राज्यातील सर्व कोरडवाहू व बागायती पट्ट्यापर्यंत येऊन पोहचली आहे. शेतकरी विरोधी धोरण जितक्या निर्दयीपणे लादले जात आहे तितक्या आत्महत्या वाढणार आहेत. दारिद्य्र निर्मूलन व शेती संकट या वेगळ्या बाबी आहे हे लक्षात घ्यावे लागेल. शेती संकट दूर करण्याचे उपाय जोपर्यंत केले जात नाहीत तोपर्यंत शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार नाहीत.
-कॉ.अजित नवले, राज्य सरचिटणीस,किसान सभा
शेतीचे कमी झालेले उत्पादन व जास्त काढलेले कर्ज यातून
कौटुंबिक, भावनिक, मानसिकदृष्ट्या शेतकरी खचतो. त्याचा संघर्ष सुरु होतो. तो आत्मविश्वास गमावून बसतो. त्यातून निराशा येते. अन् मग तो आत्महत्या हा मार्ग निवडतो. आईच्या गर्भात व्यक्तीला खूप सुरक्षित वाटते अन् जेव्हा माणसाला प्रतिकूल परिस्थितीतून सुटका होईल असे वाटत नाही त्यावेळी तो आत्महत्येचा मार्ग पत्करतो.
-प्रा.डॉ.योगिता खेडकर, मानसशास्त्र अभ्यासक