नवी दिल्ली, दि.25 -जम्मू-काश्मीरमध्ये मागील साडेतीन वर्षांत सुरक्षा दलांनी तब्बल 733 दहशतवाद्यांचा खात्मा केला, अशी माहिती केंद्रीय गृह मंत्रालयाने मंगळवारी लोकसभेत दिली.
केंद्रीय गृह राज्यमंत्री जी.किशन रेड्डी यांनी लोकसभेत लेखी उत्तरात संबंधित आकडेवारी दिली. त्यानुसार, जम्मू-काश्मीरात मागील वर्षी (2018) सर्वांधिक 257 दहशतवादी मारले गेले. त्या राज्यात 2017 मध्ये 213 तर 2016 मध्ये 159 दहशतवादी ठार झाले.
चालू वर्षात 16 जूनपर्यंत 113 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. जम्मू-काश्मीरमध्ये साडे तीन वर्षांच्या कालावधीत दहशतवादाशी संबंधित घटनांमध्ये 112 नागरिकांना त्यांचा जीव गमवावा लागला. दरम्यान, दहशतवाद बिल्कूल सहन न करण्याचे धोरण केंद्र सरकारने स्वीकारले आहे. दहशतवादाच्या विरोधात सुरक्षा दले प्रभावी आणि सातत्यपूर्ण कारवाई करत आहेत, असे रेड्डी यांनी नमूद केले. दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांवर बारकाईने नजर ठेऊन त्यांच्या विरोधातही कारवाईची पाऊले सुरक्षा दलांकडून उचलली जातात, असेही त्यांनी स्पष्ट केले.