पूरस्थितीवर पर्यावरणप्रेमींचे मत : अधिक अभ्यासाची गरज
पुणे – ओढे, नाल्यांवर होणारे अतिक्रमण, कचरा विल्हेवाटीची कूचकामी यंत्रणा ही तर पुराची दृश्य कारणे आहेत. मात्र, याहीपेक्षा जमिनीतील कार्बनद्रव्याचे घटते प्रमाण हे एक महत्त्वपूर्ण कारण आहे. यामुळे शहरात सातत्याने पूर परिस्थिती निर्माण होत आहे. सध्या हा मुद्दा फारसा अभ्यासला जात नसला, तरी आगामी काळात याबाबत अधिक अभ्यास करण्याची गरज पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त करण्यात आली आहे.
शहरातील मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचून पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. विशेषत: ओढे, नाले तुडुंब भरून अनेक ठिकाणी रस्ते, घरांमध्ये पाणी शिरले. तर अनेक ठिकाणी रस्ते खचले. शहरातील जलस्रोत, त्यावरील अतिक्रमणे आणि त्याचे दुष्परिणाम याबाबत काही पर्यावरणप्रेमी, अभ्यासकांकडून सातत्याने अभ्यास केला जात आहे. नुकत्याच एका पाहणीत जमिनीची धूप होत असल्याने त्यातील कार्बनमूल्य घटत असून, त्याचा परिणाम मातीची तग धरून ठेवण्याच्या क्षमतेवर होत असल्याचे अभ्यासकांना आढळले आहे.
याबाबत पर्यावरण अभ्यासक आदिती देवधर म्हणाल्या, “पावसाच्या पाण्याबरोबर मोठ्या प्रमाणात माती वाहून आल्याचे चित्र अनेकवेळा पाहायला मिळते. याचे मुख्य म्हणजे जमिनीतील कार्बनमूल्याचे कमी होणारे प्रमाण आहे. मोठ्या प्रमाणात होणारी वृक्ष तोड, क्रॉंक्रिटीकरण अशा कारणामुळे जमिनीची मोठ्या प्रमणात धूप होत आहे. त्यातच पाणी मुरत नसल्याने त्यातील कार्बनद्रव्याचे प्रमाणही लक्षणीय कमी होत आहे. साहजिकच याचा परिणाम मातीच्या, जमिनीच्या दर्जावर होत असून, जमिनीची तग धरून ठेवण्याची क्षमता कमी होत असून, पावसाच्या पाण्याबरोबर मातीदेखील वाहून जाते.’
“वरवर पाहता हा प्रकार अतिशय किरकोळ वाटत असला, तरी भविष्यात याचे गंभीर परिणाम उदभवू शकतील. त्यामुळेच वेळीच याबाबत अभ्यास करून, योग्य उपाययोजना राबविण्याची गरज आहे,’ असेही देवधर म्हणाल्या.