संदीप राक्षे
सातारा – सातारा पालिकेचे पदपथ मोकळे करण्याचा निर्णय शहर विकास विभागाने घेतला आहे. ही अतिक्रमण हटाव मोहीम येत्या आठवडाभरात सुरू होत असून प्रत्यक्ष कारवाईपूर्वीच राजकीय दबावतंत्राचा प्रयोग सुरू झाल्याने कारवाईला ब्रेक लागण्याची भीती आहे.
सातारा शहरात देवी चौक-मोती चौक-राजवाडा-मंगळवार तळे रस्ता, मोती चौक ते 501 पाटी आणि मध्यवर्ती बसस्थानक ते मार्केट यार्ड मंडई या ठिकाणची अतिक्रमणे हटवण्याची मोहीम आखण्यात आली आहे. त्यासाठी पोलीस बंदोबस्त मागवण्यात येणार असून याबाबतची फाईल मुख्याधिकाऱ्यांच्या टेबलवर स्वाक्षरीसाठी ठेवण्यात आली आहे.
प्रत्यक्षात या अतिक्रमणांवर हातोडा उगारला जाणार याची कुणकूण लागल्याने पुन्हा राजकीय दबावतंत्र सुरू झाले आहे. राजपथ, कर्मवीर पथ, राधिका रोड या तिन्ही प्रमुख रस्त्यांसह वर्दळीच्या चौकांमध्ये फूटपाथवर भाजी विक्रेते, हातगाड्यांची अतिक्रमणे वाढल्याने नागरिकांना पायी चालणेदेखील मुश्कील झाले आहे.या अतिक्रमणांच्या विरोधात नागरिकांच्या संतापाचा उद्रेक होण्यापूर्वीच शहर विकास विभागातील अतिक्रमण हटाव पथकाने पावले उचलायला सुरुवात केली आहे.पोलीस बंदोबस्त मिळाल्यानंतर आणि मुख्याधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीनंतर अतिक्रमण हटाव मोहीम गतिमान होणार आहे.
कोण कोणावर मेहेरबान?
अतिक्रमण मोहिमेचा विचका करणारे मेहेरबान (नगरसेवक) आणि “वरून’ होणारी फोनाफोनी, हेच वादाचे खरे मुद्दे आहेत. आतल्या हातानं मिलीभगत करणारे भाग निरीक्षक आणि वाढत्या अतिक्रमणांकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे, पालिका पदाधिकाऱ्यांचे सोयीस्कर दुर्लक्ष यामुळे शहराच्या नियोजनाचे व सौंदर्याचे वाटोळे झाले आहे.
मोती चौकातल्या ठेल्या व टपऱ्यांमध्ये नगरसेवकांना भलताच “इंटरेस्ट’ असल्याने राजकीय दबावामुळे अतिक्रमण विभागाचे हसे होते. राजकीय नेतृत्वाचा अवाजवी हस्तक्षेप व पालिका प्रशासनाची कर्तव्यशून्यता यामुळे अतिक्रमण हटाव मोहिमेचा नेहमीच बोजवारा उडतो. मुख्याधिकारी शंकर गोरे खमकेपणा दाखवत नसल्यानेही कारवाईचे घोडे अडत आहे. स्वतःची जागा भाड्याने दिल्याप्रमाणे पालिकेच्या जागा “मेहेरबानां’च्या कृपेने वाटल्या जात आहेत.
टेम्पोमधून भाजी विकणाऱ्यांना हिसका दाखवा
चांदणी चौक ते मंगळवार तळे हा रस्ता नऊ वर्षापूर्वी “नो हॉकर्स’ झोन जाहीर करण्यात आला आहे तरीही सायंकाळी पाच वाजल्यानंतर अनेक व्यापारी टेम्पोतून भाजी विकतात. फळविक्रेते, अन्य फेरीवालेही रस्ता अडवत असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. हा रस्ता पुन्हा मोकळी करण्यात येणार आहे. टेम्पोतून भाजी विकणाऱ्यांना प्रतापसिंह मंडईतल्या विक्रेत्यांनीही विरोध केल्याने तणातणी झाली होती. मात्र, अजूनही कारवाई होत नसल्याने आठ ते दहा टेम्पोवाले चांदणी चौक, विठोबाचा नळ, मंगळवार तळे येथे भाज्या विकतात. या विक्रेत्यांची मक्तेदारी मोडून काढावी, अशी मंडईत बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांची मागणी आहे.
“सातारा चिकन’वरील कारवाईतही बोटचेपेपणा
खंडोबाचा माळ परिसरातील सातारा चिकन सेंटरच्या अतिक्रमणावर कारवाईची तयारी करूनही राजकीय दबावामुळे मुख्याधिकाऱ्यांनी कच खाल्ली. संबधितांना न्यायालयाने स्टे ऑर्डर दिली, तेव्हा पालिकेच्या वकिलांनी योग्य पद्धतीने बाजू मांडली नसल्याचा आरोप होत आहे. ही स्थगिती 18 डिसेंबरपर्यंत आहे. त्यानंतर तरी पालिकेने कारवाई करण्याचे धारिष्ट्य दाखवायला हवे; परंतु त्यात झारीतल्या शुक्राचार्यांना विशेष रस असल्याने अतिक्रमण हटणार का, हाच खरा प्रश्न आहे.
रामाच्या गोटातही अतिक्रमणांवर हातोडा?
रामाचा गोट परिसरातील ऐतिहासिक हौदावर नगरसेविका सिद्धी पवार यांनी “अटल स्मृती केंद्र’ उभारले आहे. या अतिक्रमणाची जिल्हा प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली होती. या अतिक्रमणावरही कारवाई होण्याची शक्यता असल्याने राजकीय वादाला तोंड फुटण्याची चिन्हे आहेत. येत्या दोन दिवसात ही कारवाई होणार असल्याची चर्चा आहे.
गोरेसाहेब, मैदानात या
कर्मचाऱ्यांना राजकारण्यांच्या दाढेला देऊन आपण कार्यमग्न असल्याचा आव आणायचा, ही मुख्याधिकारी शंकर गोरेंची तऱ्हा आहे. राजकीय दबाव झुगारून गोरे यांनी प्रशासनाचे मुख्य या नात्याने स्वतः अतिक्रमणांच्या विरोधात दंड थोपटायला हवेत. “साहेब, केबिनमध्ये बसण्यापेक्षा मैदानात या’, असे म्हणायची वेळ आली आहे; परंतु बदलीचे वेध लागलेल्या गोरे यांच्याकडून असे वर्तन होईल, याची शक्यता नाही.