पुणे – ग्रामीण भागातून पुणे, मुंबई सारख्या शहरांत रोजगारासाठी जाणारी मंडळी पुन्हा आपल्या गावाकडे आली आहेत. या सर्व परिस्थितीमुळे ग्रामीण भागात रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी पुणे जिल्हा परिषदेने मनरेगासाठी तीन महिन्यांचे विशेष रोजगार अभियान आयोजित करण्याचा निर्णय घेतला. ज्यांना मनरेगा अंतर्गत काम आवश्यक आहे, त्यांनी गुगल फॉर्मद्वारे माहिती भरून कामाची आवश्यकता जिल्हा परिषदेला कळवल्यास नागरिकांना काम उपलब्ध करून दिले जाणार आहे.
लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून ग्रामीण भागातील बहुतांश आर्थिक व्यवस्था ठप्प झाली आहे. लोकांच्या हाताला काम नाही. अशातच पुणे, मुंबईहून आलेल्यांच्या हाताला मनरेगामधून वेळेत काम मिळाले आणि त्याला जिल्हा परिषद प्रशासनाची योग्य साथ लाभली तर, हा रोजगाराचा प्रश्न किमान काही दिवस सुटेल आणि त्यातून झालेल्या कामांतून गावागावांना त्याचा फायदा होईल. हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून जिल्हा परिषदेने मनरेगासाठी तीन महिन्यांचे विशेष रोजगार अभियान आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.
पुणे ग्रामीणमधील जास्तीत जास्त गरजू बेरोजगार व्यक्तींना याचा फायदा होईल. मनरेगाच्या माध्यमातून गावातल्या गावातच त्यांच्या हाताला काम मिळेल. सोशल मीडियाद्वारे प्रत्येक ठिकाणी गुगल लिंक पाठवली आहे, त्यावर नागरिकांना माहिती भरता येईल.
– निर्मला पानसरे, अध्यक्षा, जिल्हा परिषद