शिरूर(प्रतिनिधी) : रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील अनेक कंपन्यांमध्ये हजारो कामगार कामासाठी लागत आहे, त्यामुळे स्थानिक तरुणांनी या भागातील कंपन्यात कामासाठी तयार रहावे व कंपन्यानाही आता कामगारांची आवश्यकता असल्याचे आमदार अशोक पवार यांनी सांगून कंपन्यांनी कोरोना पासून कामगारांच्या सुरक्षिततेसाठी योग्य ती काळजी घ्यावी, अशी सूचना यावेळी दिली.
https://www.facebook.com/217046208635092/posts/1244354752570894/
आमदार अशोक पवार यांनी शिरूर तालुक्यातील औद्योगिक वसाहतीत स्थानिक तरुणांना संधी द्यावी यासाठी सुरू केलेले प्रयत्नामुळे स्थानिकांच्या नोकरीच्या आशा आता पल्लवित झाल्या आहेत. तर लॉक डाउन काळामध्ये परप्रांतीय कामगारांसाठी आमदार अशोक पवार, प्रांत अधिकारी संतोषकुमार देशमुख, तहसीलदार लैला शेख यांचे रांजणगावऔद्योगिक वसाहतीतील कंपनी व्यवस्थापनाने कौतुक केले आहे.
शिरूर तहसीलदार कार्यालय येथील सभागृहात आज स्थानिक तरुणांना रोजगार मिळावा याकरिता रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील 19 बड्या कंपनीतील मनुष्यबळ अधिकारी व आमदार अशोक पवार, प्रांताधिकारी संतोष कुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली बैठक झाली. यावेळी तहसीलदार लैला शेख, रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश कुमार राऊत या बैठकीला उपस्थित होते.
कोरोनाव्हायरस भीती आणि दहशत, लॉकडाऊन त्यामुळे परप्रांतीय व महाराष्ट्र राज्यातले हजारो कामगार आपल्या घरी गेले असल्याची चर्चा यावेळी बैठकीत झाली. त्यात कुशल कामगार व अनुभवी कामगार होते. तसेच राज्यातील अनेक कुशल कामगार ही आपापल्या गावी गेले आहेत. परंतु या कामगारांना पुन्हा या भागात नोकरीसाठी घरातील नातेवाईक कोरोनाच्या भीतीने पाठवत नसल्याचे कंपनी अधिकारी वर्गाने सांगितले आहे.
त्यांची मानसिकता या भागात मुलांनी नोकरी करू नये अशी झाली आहे. परप्रांतीय अनेक कामगार आपापल्या भागात अडकले आहेत त्यांच्या येण्याची सोय कंपनी करते आहे परंतु ते इथे आल्यानंतर त्यांना क्वारंनटाईन व्हावे लागेल. त्यासाठी अशा कामगारांची 14 दिवसाचे क्वारंटाईन कमी करावे किंवा त्याबाबत वेगळा निर्णय घ्यावा अश्या अनेक अटी कंपनी व्यवस्थापनाने आमदार अशोक पवार व प्रांताधिकारी संतोष कुमार देशमुख यांच्या समोर ठेवून कंपनी व्यवस्थापनाला विजबिलमध्ये सवलत मिळावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
अनेक कंपन्यांनी वेल्डर, फिटर यासारख्या अनेक कुशल कामगारांची मागणी केली आहे. तसेच काही अकुशल कामगार असतील तर त्यांना प्रशिक्षणही देण्याची तयारी ठेवली आहे. सध्या कंपनी मध्ये स्थानिक कामगार काम करत आहेत परंतु आणखी कामगारांची आवश्यकता लागणार आहे त्यासाठीच स्थानिकांना प्राधान्य देण्याचेही कंपनी व्यवस्थापनांनी कबूल केले. स्थानिक कामगार भेटले तर कंपनीला सोयीचे असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
शिरूर तालुक्यातील ज्या भागात कोरोना रुग्ण सापडेल त्या भागातील माहिती त्वरित कंपनी व्यवस्थापनाला कशी मिळेल व त्यामुळे तेथील कामगारांना सुरक्षित ठेवता येईल तसेच एमआयडीसी तसेच इतर भागातील कारखान्यांना भेडसावणाऱ्या कामगार तुटवडा तसेच इतर समस्या संदर्भात शासनस्तरावर मदतीसाठी पाठपुरावा करू. त्यासाठी कंपनी व्यवस्थापन आणि त्यांना येणाऱ्या अडचणी काही भेडसावणारे प्रश्न यासंदर्भात शासनदरबारी आवाज उठवू त्यासाठी कंपनी व्यवस्थापनाने लेखी पत्र प्रांत अधिकारी संतोष कुमार देशमुख यांच्या मेलवर पाठवावेत अशा सूचनाही ही आमदार अशोक पवार यांनी यावेळी कंपनी व्यवस्थापनाला दिल्या. तसेच कंपनी कामगार सुरक्षितेसाठी कामगारांचे टेंपरेचर तपासावे, पल्स ऑक्सीजनही तपासावे यासाठीची यंत्रणा कंपनी व्यवस्थापनाने उपलब्ध करावी असे पवार यांनी कंपनी व्यवस्थापनाला सांगितले.
कंपनी व्यवस्थापनाला ज्या काही अडचणी येतील त्या सर्व अडचणी, कामगारांना ने-आण करण्याच्या अडचणी तसेच परराज्यातून येणाऱ्या कामगारांना आणण्यासाठीच्या अडचणी सोडवण्याचे काम करणार असून कंपनी व्यवस्थापनाने कामगारांच्या सुरक्षिततेकडे जास्त लक्ष द्यावे. या अगोदरही कंपनीच्या अनेक अडचणी लॉक डाऊन काळात सोडवले असल्याचे त्यांनी सांगितले.