नवी दिल्ली: भारताची राष्ट्रीय हवाई कंपनी असलेल्या ‘एअर इंडिया’ला विकत घेण्यासाठी आता या कंपनीतील कर्मचाऱ्यांकडूनच प्रयत्न सुरु असल्याचे सांगण्यात आहे. तब्बल 209 कर्मचाऱ्यांच्या एका गटाकडून वित्तपुरवठा करणाऱ्या खासगी कंपनीची मदत घेण्यात येणार आहे. याशिवाय, प्रत्येक कर्मचाऱ्याकडून एक-एक लाख रुपयांची वर्गणी काढली जाणार आहे. कर्मचाऱ्यांची वर्गणी आणि इक्विटी फंड या माध्यमातून एअर इंडियाच्या खरेदीसाठी बोली लावली जाणार असल्याचे म्हटले जात आहे.
एअर इंडियाच्या वाणिज्य संचालक मीनाक्षी मलिक या कर्मचाऱ्यांच्या गटाचे नेतृत्व करत आहेत. त्यांनी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना एक पत्र लिहले आहे. यामध्ये मीनाक्षी यांनी म्हटले आहे की, पीआयएमनुसार (प्राथमिक सूचना निवेदन) एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना कंपनीची मालकी मिळवता येऊ शकते. त्यासाठी काही अटी-शर्तींची पूर्तता करणे गरजेचे आहे. मात्र, आपण सामूहिकपणे एअर इंडिया खरेदी करू शकतो, असे मीनाक्षी मलिक यांनी पत्रात म्हटले आहे. प्रसारमाध्यमांमध्ये एअर इंडियाच्या लिलाव प्रक्रियेबाबत छापून आलेल्या बातम्या खऱ्या असतील तर आपण इतर कॉर्पोरेट कंपन्यांसोबत बोली लावू शकतो. मात्र, त्यासाठी आपल्याला एअर इंडिया कंपनी चालवण्याची क्षमता सिद्ध करणारी कागदपत्रे जमा करावी लागतील,असे मलिक यांनी म्हटले आहे.
तसेच आर्थिकदृष्ट्या विचार करता आपल्याकडे या बोली प्रक्रियेत भाग घेण्यासाठी आवश्यक स्रोत नाहीत. त्यामुळे आपण एका खासगी इक्विटी फंडची मदत घेणार आहोत. ही कंपनी आपल्यासोबत एअर इंडियात गुंतवणूक करेल आणि नफा वाटून घेईल, अशी माहिती मलिक यांनी दिली. एअर इंडियामध्ये कर्मचारी वर्गाची भागीदारी 51 टक्के राहील, या अटीवरच आपण संबंधित वित्तपुरवठा कंपनीशी बोलणी करत असल्याचेही मीनाक्षी मलिक यांनी स्पष्ट केले.
एअर इंडियाच्या लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी आपल्याला काही अटी-शर्तींचे पालन करावे लागेल. त्यासाठी विवेक आणि गोपनीयतेने काम करण्याची गरज आहे. कोणतीही माहिती बाहेर फुटली तर आपण लिलाव प्रक्रियेतून बाहेर फेकले जाऊ. त्यामुळे आपल्या गटाबाहेरील कोणत्याही लोकांशी चर्चा करु नये, असे आवाहन मीनाक्षी मलिक यांनी कर्मचाऱ्यांना केले.