बीएसएनएल लवकर पुनरुज्जीवित करण्याची मागणी
तत्काळ 4-जी सेवा सुरू करण्याचा आग्रह
नवी दिल्ली – बीएसएनएलच्या पुनरुज्जीवनासाठी केंद्र सरकार फक्त घोषणा करीत आहे. मात्र, या निर्णयाची अंमलबजावणी केली जात नाही. याकडे लक्ष वेधण्यासाठी बीएसएनएलच्या कर्मचाऱ्यांनी सोमवारी ट्विटरवर आंदोलन केले.
या कंपनीला पुनरुज्जीवित करण्यासाठी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या प्रस्तावाची वेगात अंमलबजावणी करावी. त्याचबरोबर कंपनीच्या 4- जी सेवा तत्काळ सुरू करण्यात याव्यात, असे ट्विट करण्यात आले. केंद्रीय मंत्रिमंडळाने दिलेल्या मंजुरीनुसार आतापर्यंत बीएसएनएलच्या 4- जी सेवा सुरू व्हायला पाहिजे होत्या. मात्र, यासाठी आवश्यक निर्णय घेण्याचे टाळले जाते. त्यामुळे अजूनही बीएसएनएलच्या 4- जी सेवा देशभर सुरू झालेल्या नाहीत.
जग 5- जी सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न करीत असताना बीएसएनएलला मात्र 4- जी सेवाही सुरू करता आलेल्या नाहीत. याचा परिणाम बीएसएनएलच्या कर्मचाऱ्यापेक्षा ग्रामीण भागातील जनतेवर होत आहे. ग्रामीण भागातील जनतेला यामुळे वेगवान दूरसंचार सेवा उपलब्ध होत नाहीत. त्यांना इंटरनेटचा लाभ घेता येत नाही, असे या कर्मचाऱ्यांनी केंद्र सरकारला आंदोलनाबाबत पाठवलेल्या नोटिशीत म्हटले आहे.
4-जी सेवांची अंमलबजावणी सुरू होत नसल्यामुळे बीएसएनएलच्या महसुलावर भयंकर परिणाम होत आहे. यासाठी दूरसंचार विभागाने तातडीने 4- जी सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, बीएसएनएलच्या असे कामगार संघटनेने म्हटले आहे.
पंतप्रधानांना साकडे
बीएसएनएलच्या कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयानुसार सोमवारी या सर्व कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी ट्विट केले. हे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी, पंतप्रधान कार्यालय, केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद आणि विविध वृत्तमाध्यमांना पाठविण्यात आले. या अगोदरही आम्ही अनेक वेळा विविध प्रकारे आंदोलन करूनही आमच्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला असूनही आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे कर्मचारी संघटनांनी म्हटले आहे. त्यामुळे आम्हाला ट्विट करण्याचे आंदोलन करावे लागत आहे. आगामी काळातही आंदोलन चालूच राहणार आहे.