हॉटेल व्यावसायिकांच्या कचऱ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
शिक्रापूर- सणसवाडी (ता. शिरूर) येथे पुणे- नगर महामार्गालगत परिसरातील हॉटेल व्यावसायिकांकडून रात्रीच्यावेळी रस्त्याच्या कडेला कचरा टाकला जात आहे. रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर कारवाई होणे गरजेचे आहे.
सणसवाडीसह परिसरात हॉटेल व इतर अनेक व्यावसायिकांचे जाळे निर्माण झाले आहे. या हॉटेलमधून गोळा होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी हॉटेल व्यावसायिक कोणतीही काळजी घेत नाहीत. हा कचरा खुलेआम रस्त्याच्या कडेला टाकून देत आहेत. हॉटेलमधून गोळा होणारा शाकाहारी व मांसाहारी जेवणाचा कचरा हॉटेल व्यावसायिकांकडून पुणे- नगर रस्त्याच्या कडेला टाकून दिला जात आहे. यामुळे रस्त्याच्या कडेला घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
रस्त्याच्याकडेला टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यामुळे भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. त्यामुळे याठिकाणी अन्नाच्या शोधात अनेक कुत्रे आल्यामुळे कुत्र्यांच्या होणाऱ्या भांडणातून काही कुत्रे अचानकपणे रस्त्यावर पळत आल्यामुळे अनेक दुचाकीचालाकांचे अपघात झाले आहेत. अपघातांमुळे दुचाकीचालक गंभीर जखमी झालेले आहेत. या ठिकाणी कचरा टाकणाऱ्या हॉटेल व्यावसायिकांना कसलेही भय राहिलेले नाही. रस्त्याच्या कडेला टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे याठिकाणी कचरा टाकणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई होणे गरजेचे आहे.
- कचरा टाकणाऱ्यांना नोटीस बजावणार- सरपंच रमेश सातपुते.
सणसवाडी येथे रस्त्याच्या कडेला कचरा टाकत जात असल्याबाबत सरपंच रमेश सातपुते यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, याठिकाणी कचरा टाकणाऱ्या हॉटेल व्यावसायीकांना प्रथम नोटीस देऊन त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा सातपुते यांनी दिला.