महेश जाधव
अपघातांना निमंत्रण; राष्ट्रीय महामार्ग की ग्रामसडक?
मायणी – मनमाड-बेळगाव या नियोजित राष्ट्रीय महामार्गावर मायणी ते दहिवडी दरम्यानच्या 35 किलोमीटर अंतरात शेकडो खड्डे पडले आहेत. विशेष म्हणजे यातील बहुतांश खड्डे खटाव तालुक्यात असून ते अपघातांना निमंत्रण देत आहेत. त्यामुळे हा राष्ट्रीय महामार्ग आहे की, ग्रामसडक योजनेतील खराब झालेला रस्ता आहे, असा प्रश्न तालुक्यातील जनतेला व वाहनचालकांना पडला आहे.
केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी खटाव-माण तालुक्यातून सांगली व पुणे जिल्ह्यात जाणारा राज्यमार्ग क्र. दहा हा मनमाड ते बेळगाव या राष्ट्रीय महामार्गात समाविष्ट करण्याची घोषणा केली होती. या घोषणेला तीन वर्षांचा कालावधी लोटला असला तरी या तीन वर्षात या मार्गावर खड्ड्यांचे प्रमाण वाढले आहे. मनमाड-बेळगाव हा नियोजित राष्ट्रीय महामार्ग खटाव, माण व फलटण या दुष्काळी तालुक्यांमधून जाणार असल्याने या तालुक्यांमधील नागरिकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. फलटण व माण या तालुक्यांच्या तुलनेने खटाव तालुक्यातील या मार्गाची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. सूर्याचीवाडी, बनपुरी, कातरखटाव, बोंबाळे, तडवळे या गावांमधून जाणाऱ्या मार्गावर सहा इंचापासून एक फुटापर्यंत खोली असलेले शेकडो खड्डे आहेत. या मार्गाला छेद करून उरमोडी व तारळी योजनांचे पाट गेले आहेत.
या पाटांवर बांधण्यात आलेल्या पुलांच्या दोन्ही बाजूस रस्ता अतिशय खराब झाल्याने वाहनचालक मुख्य रस्ता सोडून साइडपट्टीचा वापर करतात. त्यामुळे समोरून येणाऱ्याला आपले वाहन नेमके कसे चालवायचे, याचा अंदाज येत नाही. त्यामुळे तेथे अपघातांना निमंत्रण मिळत आहेत. एकच राष्ट्रीय महामार्ग असताना खटाव, माण व फलटण या तालुक्यांमध्ये या रस्त्याची अवस्था वेगवेगळी का, असा प्रश्न पडत आहे तशीच अवस्था मायणी-म्हसवड या मार्गाची आहे. यातही खटाव तालुक्यातून जाणाऱ्या दहा किलोमीटर अंतरात शेकडो खड्डे आहेत. खटाव तालुक्याला हक्काचा आमदार नसल्याने रस्त्यांची अवस्था अशी झाली आहे का, असा या तालुक्यातील जनतेला पडलेला प्रश्न आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने खटाव तालुक्याच्या हद्दीतील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून संभाव्य अपघात टाळावेत, अशी मागणी खटाव तालुक्यातील नागरिक करत आहेत.