हार्वेस्टरच्या वापरामुळे वाढली डोकेदुखी : पुरामुळे रोजगारही हिरावण्याची शक्यता
पुणे – यंदाच्या पुरामुळे पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखानदारीसमोर अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. तर या साखर कारखान्यांच्या गळीत हंगामावर अवलंबून असलेल्या ऊसतोड कामगारांना देखील त्याची झळ बसणार आहे.
ऊसतोडणीसाठी हार्वेस्टरचा वाढता वापर या कामगारांची डोकेदुखी ठरत असतानाच पुरामुळे झालेले उस पिकाच्या नुकसानीने त्यात भर टाकली आहे. परिणामी काही वर्षांतच मानवी उसतोड बंद होऊन पूर्णत: यंत्राद्वारे ऊसतोड होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
साखर कारखान्यांच्या पट्टयात ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता या मजुरांना ऊसतोडणीचे काम करावे लागते. ऊसतोडीसाठी उचल घेतली असल्याने त्यांना हा धंदा सोडताही येत नाही. साखर हंगामात फक्त सहा महिने रोजगार मिळतो आणि उर्वरित सहा महिने रोजगाराशिवाय काढावे लागतात. एवढे करूनही पगार त्यांना पुरेसा मिळत नाही. हातात फारशी शिल्लक राहत नाही. त्यामुळे या मजुरांचे प्रश्न प्रलंबित आहेत. या मजुरांना पुढे भविष्य नाही. हात-पाय चालतात, तोपर्यंत काम आहे. पुढे काय करायचे, हा प्रश्न त्यांच्यापुढे उभा राहिला आहे.
हार्वेस्टरने ऊसतोड करण्यासाठी कारखाने 500 रुपये खर्च करतात. मात्र, उसतोड कामगारांना एका टनासाठी केवळ 228 रुपये दिले जातात. संपाचे हत्यार उपसल्यानंतर 190 रुपयांची रक्कम 228 रुपयांवर पोचली. हा दर 350 रुपये द्यावा, अशी कामगारांची मागणी आहे. पण यंदा पुरामुळे उस पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. उत्पादक व उस तोडणी कामगारांना बसणार आहे.