सातारा – सातारा जिल्ह्यामध्ये निसर्ग अत्यंत समृद्ध असून, पर्यावरण संतुलन ही बाब महत्त्वाची आहे. त्या पर्यावरणाच्या संतुलनासह साताऱ्यात पर्यटन व्यवसायाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने कास, महाबळेश्वर, पाचगणी या भागांच्या संदर्भात उपाययोजना केल्या जातील, अशी स्पष्ट ग्वाही साताऱ्याचे नूतन जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
तत्कालीन जिल्हाधिंकाऱ्यांनी जे जे चांगले उपक्रम जिल्ह्याच्या विकासासाठी राबवले, त्या चांगल्या परंपराही यापुढे सुरू ठेवल्या जातील. कास, महाबळेश्वर येथील अतिक्रमणांच्या संदर्भात कायदेशीर बाबींचे तथ्य तपासूनच पुढील निर्णय घेतला जाईल असे आश्वासन त्यांनी दिले. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी येथील पदभार स्वीकारल्यानंतर नियोजन भवनात प्रथमच पत्रकारांशी संवाद साधला. पत्रकारांच्या वेगवेगळ्या प्रश्नांना त्यांनी सविस्तरपणे उत्तरे दिली. डुडी म्हणाले, “कोणताही निर्णय धडकपणे घेणे हे सहज शक्य आहे. मात्र असे निर्णय चिरकाल टिकत नाहीत. त्यामागे कृतिशील रचनात्मक कामाची बैठक असावी लागते. त्यासाठी व्यापक प्रयत्नांची आवश्यकता असते.
त्यामुळे माझा जिल्ह्याचा अभ्यास सुरू झाला असून सर्व विभाग प्रमुखांच्या बैठका यापुढे वारंवार घेतल्या जातील. त्यानुसार जिल्ह्याचे पुनर्वसन, सिंचन, पर्यावरण, आरोग्य, शिक्षण याचे कोणते प्रश्न आहेत, हे समजून घेणे सोपे जाणार आहे. सर्वसामान्यांच्या कामांना कधीही न अडवता तात्काळ ते निकाली कसे निघतील याची दक्षता घेतली जाईल.
त्यामुळे मला थोडासा वेळ द्या. या वेळेत सर्व प्रश्नांचा अभ्यास करून त्यानुसार कामाचे प्राधान्यक्रम ठरवला जाईल. सातारा जिल्हा कशात आघाडीवर आहे आणि काय होणे गरजेचे आहे याचा ताळमेळ साधूनच विकास कामाच्या मुद्द्यांवर बोलणे इष्ट ठरेल असे ते म्हणाले. महाबळेश्वर येथे तत्कालीन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी शंभर कोटीचा आराखडा राबवला होता. त्या आराखड्याचा अभ्यास करून त्या धर्तीवर सातारा, पाचगणी, कास तसेच इतर ब आणि क वर्गाची जी पर्यटन स्थळे आहेत, त्यांना कशा सुविधा देता येतील याचा आराखडा अभ्यास करून बनवला जाईल असे ते म्हणाले. ज्या पद्धतीने महाबळेश्वर तालुक्यातील