औरंगाबाद – राज्यात करोना संसर्गाची दुसरी लाट तीव्र होत असून जिल्ह्यात वाढीव रूग्ण संख्येच्या प्रमाणात सर्व यंत्रणांनी अत्यावश्यक उपचार सुविधांसह सज्ज राहावे. समन्वय आणि सतर्कतापूर्ण प्रतिबंधात्मक उपाययोजनांव्दारे संसर्गापासून जिल्ह्याचे संरक्षण करावे. तसेच ट्रेसिंग, टेस्टिंग, ट्रिटमेंट ही त्रिसुत्री वापरावी, असे आदेश औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी दिले.
जिल्ह्यातील कोना संसर्ग व प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या संदर्भात व्हिडिओ कॉन्फरंसव्दारे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी सर्व यंत्रणांचा आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. देसाई यांनी जिल्ह्यातील सर्व यंत्रणांकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेऊन वाढीव रूग्णसंख्येच्या प्रमाणात कोविड केअर सेंटर व सर्व रूग्णालयांमध्ये अतिरिक्त खाटांची उपलब्धता ठेवण्याच्या दृष्टीने यंत्रणांव्दारे करण्यात येत असलेल्या प्रयत्नांबद्दल समाधान व्यक्त करून घाटीतील गंभीर रूग्णांचा मृत्यूदर कमी करण्याच्या दृष्टीने विशेष खबरदारी घेण्याचे सूचित केले.
तसेच गेल्या वर्षभरापासून यशस्वीपणे आपण या संसर्गाचा सामना करत असलो तरी जोपर्यंत जनता सक्रियपणे शासन प्रशासनाच्या प्रयत्नांना सहकार्य करणार नाही तोपर्यंत आपण हा वाढता संसर्ग रोखू शकणार नाहीत, याचे गांभीर्य लक्षात घेऊन सर्व नागरिकांनी कोविड नियमावलीचे अधिक कटाक्षाने पालन करणे गरजेचे असल्याचे सांगितले.